धाकधूक… बारावीचा निकाल तयार; कोणत्याही क्षणी निकालाची तारीख होणार जाहीर
राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल तयार करण्यात आला असून कोणत्याही क्षणी मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
निकालाचे बहुतांश काम पूर्ण झाल्याने निकाल आठवडाभरात जाहीर केला जाणार आहे. परीक्षेला बसलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून केवळ गुण आणि गुणपत्रिका आदी टप्प्यातील कामही पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने हा निकाल या आठवडय़ातच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनीही बारावीच्या निकालाच्या संदर्भातील तयारी पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने मे महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल असे नुकतेच स्पष्ट केले होते. त्यामुळे राज्यातील पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत या निकालाची मंडळाकडून अधिपृत तारीख जाहीर केली जाईल आणि एका आठवडय़ातच दहावीचाही निकालही जाहीर केला जाणार आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
मागील काही दिवसांत सोशल मीडियावर दहावी, बारावी निकालाच्या तारखा जाहीर केल्या जात आहेत. मात्र जोपर्यंत मंडळाच्या अधिपृत संकेतस्थळावरून निकालाची तारीख जाहीर केली जाणार नाही तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थी-पालकांनी सोशल मीडियावरील निकालाच्या तारखांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List