पेटवा क्रांतीची मशाल! आज मुंबईतील 6 जागांसह 13 मतदारसंघांत मतदान
हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवण्याचा, महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवण्याचा आणि क्रांतीची मशाल पेटवण्याचा दिवस अखेर उजाडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आज महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. परिवर्तनाचा निर्धार करून महाविकास आघाडी भक्कमपणे या लढय़ात उतरली असून शिवसेनेच्या आठ शिलेदारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 13 उमेदवार या टप्प्यात आपले नशीब आजमावत आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षेसाठी पोलिसांची फौज तैनात आहे. अनुचित घडवण्याची संधी कुणाला मिळू नये म्हणून राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही डोळय़ात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. मतदारांनी आपले मत वाया घालवू नये, आपला मतदानाचा अधिकार आवर्जून बजावावा यासाठी आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
– मतदानाचे चार टप्पे आतापर्यंत पार पडले आहेत. 543 पैकी 380 जागांवर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उद्याच्या मतदानानंतर 429 जागांवरील मतदान पूर्ण होईल. त्यानंतर दोन टप्पे उरणार असून त्यात 114 जागांवर मतदान होईल. दरम्यान, ओडिशात विधानसभेच्या 35 जागांसाठीही उद्या मतदान होणार आहे.
होमगार्डला हृदयविकाराचा झटका
ऍण्टॉप हील पोलीस ठाणे येथे निवडणूक बंदोबस्तावर तैनात असणारे होमगार्ड बक्कल क्रमांक 8236 रुपसिंग राठोड (29) यांना शनिवारी रात्री सौम्य हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ सायन रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना तपासून अतिदक्षता विभागात दाखल केले. तसेच राठोड यांच्या नातेकाईकांशी संपर्क साधण्यात आला. राठोड हे मूळचे सातारा जिल्ह्यातील सैदापूर तालुक्यातील रहिवासी आहेत.
निवडणूक अधिकाऱयाचा मृत्यू
दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील वडाळा विधानसभा मतदार संघातील बूथ क्रमांक 189 मध्ये असलेल्या सेंट पॉल मुलांच्या शाळेतील मतदान केंद्रावर प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून नेमण्यात आलेले सुनील लक्ष्मण गवळी (56) यांच्या आज अचानक छातीत दुखू लागले. ते काही वेळातच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने परळमधील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
देशातील 49 जागांवर मतदान
पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहार आणि ओडिशातील प्रत्येकी 5, झारखंडमधील 3, जम्मू-कश्मीर, लडाखमधील प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे. या टप्प्यात 49 जागांवर 695 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 613 पुरुष तर 82 महिला उमेदवार आहेत.
रायबरेलीकडे देशाचे लक्ष
वायनाडनंतर राहुल गांधी उत्तर प्रदेशातील पारंपरिक रायबरेली मतदारसंघातूनही लढत आहेत. तिथे उद्या मतदान होणार असून या लढतीकडे देशाचे लक्ष आहे. राहुल गांधी यांच्यासमोर भाजपचे दिनेश सिंह उभे आहेत. गांधी घराण्यासाठी ही प्रतिष्ठsची लढाई असून मी माझं लेकरू तुम्हाला सोपवतेय, असे भावनिक आवाहन सोनिया गांधी यांनी रायबरेलीवासीयांना शेवटच्या प्रचारसभेतून केलेले आहे.
– पाचव्या टप्प्यात 49 जागांवर उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांत मुंबईकरांचा कौल मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. उद्याच्या मतदानानंतर देशातील 429 जागांवरील मतदान पूर्ण होईल.
– दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण-मध्य मुंबईतून अनिल देसाई, उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून संजय दिना पाटील, उत्तर- पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर, ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून वैशाली दरेकर-राणे, पालघरमधून भारती कामडी आणि नाशिकमधून राजाभाऊ वाजे असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आठ शिलेदार मशाल हाती घेऊन या टप्प्यात निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले आहेत. उत्तर-मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, उत्तर मुंबईतून भूषण पाटील, धुळय़ातून शोभा बच्छाव हे काँग्रेसचे उमेदवार नशीब आजमावत आहेत, तर भिवंडीतून बाळय़ामामा म्हात्रे आणि दिंडोरीतून भास्कर भगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तुतारी फुंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शिवसेनेच्या आठ शिलेदारांसह महाविकास आघाडीचे 13 उमेदवार मैदानात
अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)
अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई)
संजय पाटील (उत्तर पूर्व मुंबई)
अमोल कीर्तिकर (उत्तर पश्चिम मुंबई)
राजन विचारे (ठाणे)
वैशाली दरेकर (कल्याण)
भारती कामडी (पालघर)
राजाभाऊ वाजे (नाशिक)
वर्षा गायकवाड (उत्तर मध्य मुंबई)
भूषण पाटील (उत्तर मुंबई)
बाळय़ामामा म्हात्रे (भिवंडी)
भास्कर भगरे (दिंडोरी)
शोभा बच्छाव (धुळे)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List