मंगळवेढय़ातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई; 13 टँकरद्वारे 25230 लोकसंख्येला होतोय पाणीपुरवठा

मंगळवेढय़ातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई; 13 टँकरद्वारे 25230 लोकसंख्येला होतोय पाणीपुरवठा

तालुक्याच्या दक्षिण भागात पाण्याची तीव्र भीषणता वाढत असल्याचे विदारक चित्र आहे. सध्या तालुक्यात 13 टँकरद्वारे 10 गावे व 85 वाडय़ा-वस्त्यांवरील 25 हजार 230 लोकांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपअभियंता राजकुमार पांडव यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यात गतवर्षी पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने भूगर्भात पाणीसाठा होऊ शकला नाही तसेच नदी, नाले, ओढे, विहिरी पाण्याअभावी कोरडे राहिले. परिणामी ऐन उन्हाळी हंगामात तालुक्याच्या दक्षिण भागात पाण्याची तीव्र भीषणता जाणवत असून, नागरिकांवर पाणी…पाणी… म्हणण्याची वेळ आली आहे. मानवाबरोबर मुक्या प्राण्यांचा पाणीप्रश्नही ऐरणीवर आला आहे. बारमाही वाहणारी भीमा व माण नद्यांनी तळ गाठल्याने नदीपात्रात जनावरांनाही पिण्याइतपतही पाणी उपलब्ध नसल्याचे विदारक चित्र आहे.

नदीकाठावरील बागायत क्षेत्रही धोक्यात सापडले आहे. सध्या 13 खासगी टँकरद्वारे येड्राव, गणेशवाडी, भाळवणी, आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, शिवणगी, बावची, निंबोणी, शिरनांदगी, सरगर खु. आदी गावे व 85 वाडय़ा-वस्त्यांमधील 25 हजार 230 लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. येळगी, हिवरगांव, खुपसंगी, मारोळी, भोसे, खवे, लवंगी, हाजापूर, नंदेश्वर, लेंडवे चिंचाळे, रड्डे, दामाजीनगर आदी 12 गावांमधून टँकरची मागणी जि.प. पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. मागील पाच वर्षांत मंगळवेढा तालुका हा टँकरमुक्त झाला होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पुन्हा टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सध्या ‘भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजने’च्या मुख्य संकुलनातून रड्डे, चाळीसधोंडा, जुनोनी, शिरभावी आदी ठिकाणांहून टँकरद्वारे पाणी भरून संबंधित गावांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले.

टॉपरप्रुफ वॉलद्वारे पाइपलाइनला लागलेली गळती रोखण्याचा प्रयत्न

n ‘भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजने’ची पाणीपुरवठा विहीर उचेठाण भीमा नदीपात्रात असून, येथून भोसे पाणीपुरवठा योजना ही जवळपास 105.5 कि.मी. अंतरावर पाणी वाहून पाईपलाईनद्वारे न्यावी लागत असल्याने या पाईपलाईनला अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज होऊ नये म्हणून एअरवॉल बसविण्यात आले आहेत. मात्र, दक्षिण भागात हे एअरवॉल नागरिक खोलून त्यामधून पाणी घेत असल्याने बरेच ठिकाणी पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. जि. प. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांनी हा प्रकार थांबविण्यासाठी नवीन टॉपरप्रुफ वॉल 9 ठिकाणी बसवून पाण्याची गळती थांबविण्याचे प्रयत्न केले आहेत. या योजनेस 40 गावचे सरपंच व ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभत असल्याने सध्या तरी भोसे पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे चालू असल्याने ऐन पाणीटंचाईच्या कालावधीत, उन्हाळय़ात येथील जनतेला पाणीपुरवठा योजनेचा दिलासा मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;