निवडणुकीनंतर मिंध्यांना भाजपचे टाळ कुटत बसावे लागेल! – संजय राऊत
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिंधे आणि अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही. निवडणुकीनंतर त्यांना भाजपमध्येच विलीन व्हावे लागेल आणि भाजपचे टाळ कुटत बसावे लागेल, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना लगावला.
‘इंडिया’ आघाडीला देशात 300 हून अधिक जागांवर विजय मिळेल. ‘इंडिया’ आघाडीची सत्ता आली, तर उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार का असू नयेत? महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, असे मतही खासदार संजय राऊत यांनी मांडले. पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्याला पंतप्रधानपदाची संधी मिळाली नाही, मात्र जी संधी शरद पवार साहेबांना मिळाली नाही ती उद्धव ठाकरे यांना मिळाली तर हरकत काय आहे, असे सांगत संजय राऊत पुढे म्हणाले, ‘एनडीए’ 200 जागांच्या आतच असेल. मात्र ‘इंडिया’ आघाडी 300 जागांहून अधिक ठिकाणी विजयी होणार आहे. तसेच राज्यात सर्वांत चुरशीची लढत ही पुणे मतदारसंघात होत आहे.’
विशाल पाटील समजूतदार, आम्ही वाट पाहतोय
सांगली हा मतदारसंघ अनेक वर्षे काँग्रेसचा आहे, मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात तो शिवसेनेकडे आला. त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार दिला आहे. साहजिकच कार्यकर्त्यांची भावना असते, ही लोकशाही आहे. मात्र, विशाल पाटील यांच्याशी आमचा संवाद आहे. वसंतदादा पाटील यांचे घराणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचे अत्यंत चांगले संबंध आहेत. विशाल पाटील हे आमच्या महाविकास आघाडीच्या कुटुंबातीलच आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. विशाल पाटील समजूतदार आहेत. अर्ज परत घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही वाट पाहत आहोत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List