नगरमध्ये पाण्याचा ठणठणाट! टँकर्सची संख्या 150 पार
उन्हाच्या चढत्या पाऱयाबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताणदेखील वाढू लागला आहे. जिह्यात 148 गावे आणि 783 वाडय़ा-वस्त्यांवरील 3 लाख 5 हजार 866 लोकांची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 150 टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. अजूनही बरीच गावे, वाडय़ा-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे टँकरचा आकडा 200 पार जाण्याची शक्यता आहे.
यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिह्यातील पाणीटंचाईची स्थिती लवकरच जाणवू लागली. त्यातच उन्हाच्या चढत्या पाऱयामुळे पाणीसाठय़ाचा जलस्तर झपाटय़ाने खाली जाऊ लागला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱया गावांची आणि वाडय़ांची संख्या एप्रिलमध्येच लक्षणीय वाढली.
एकीकडे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली आणि नियंत्रणाखाली निवडणुकीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जात असतानाच, दुसरीकडे दैनंदिन कामकाज आणि टंचाईच्या उपाययोजनांची प्रशासनाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे.
स्थानिक पातळीवरील यंत्रणेने टंचाई परिस्थितीवर गांभीर्याने काम करावे, आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, टँकरचे प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले आहेत. प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांच्याकडे आहेत. एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ात टँकरची संख्या 100 झाली होती. जिह्यात 148 गावे आणि 783 वाडय़ांवरील तब्बल तीन लाख 5 हजार 866 लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी 150 टँकर सुरू आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List