पावसाने खेळ मांडला… आधार कुणाचा न्हाई… ठाणे, पालघर, रायगडात बळीराजा उद्ध्वस्त; वीटभट्ट्यांचा चिखल
परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम, त्या पाठोपाठ अरबी समुद्र आणि बंगाल च्या उपसागरात कमी दाबाचे तयार झालेले क्षेत्र यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाचा खेळ गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाला आहे. भातपीक कापणीला आल्यानंतर अनपेक्षितपणे पाऊस सुरू झाल्याने शेतकरी फक्त आधारहीन नाही तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या पावसाचा फटका भातपिकाबरोबर वीटभट्ट्यांनाही बसला आहे. अनेक ठिकाणी कच्च्या विटांचा चिखल झाला आहे.
तलासरी परिसरात २३ हजार हेक्टरवर शेती केली जाते. त्यापैकी भातपिकाखाली एकूण ६ हजार ४०० हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यातील तलासरी, कवाडा, सवने, वसा, करजगाव, गिरगाव, घिमानिया, संभा, डोंगरी, आमगाव, अच्छाड, काजळी, उपलाट, वरवाडा, साक्रोली, कोचाई, बोरमाळ, अनवीर, सूत्रकार, कुझें, वडवली, उधवा, कोदाड येथील शेतकऱ्यांनी भात लागवड केली आहे. या भागातील भातपिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वाडा तालुक्यातील भातशेतीलाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. कापणीला आलेला भात पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
शहापूरमध्ये कापलेला भात भिजला
शहापूर आणि खर्डी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी भाताची कापणी गेल्या आठवड्यापासून सुरू केली आहे. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतात कापून ठेवलेला भात भिजला आहे. खर्डी, कसारा, किनव्हली, दहिगाव, टेंभा, अजनुप, दळखण येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भिवंडीत वीटभट्टीचालकांचे नुकसान
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात वीटभट्टीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. परतीच्या पावसाने निरोप घेतल्यानंतर अनेक ठिकाणी विटा तयार करण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे कच्च्या विटांचा चिखल झाला असल्याने वीटभट्टीचालकांचे नुकसान झाले आहे.
खरीप, रब्बी हंगाम वाया गेला
मुरुड आणि उरण तालुक्यात शेतकऱ्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने खरीप हंगाम वाया गेला असून आता शेतात पाणी साचले असल्याने रब्बी हंगामही वाया जाणार आहे. दोन्ही हंगाम वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, केवायसी आणि फार्मर आयडी अटी टाकू नयेत अशी मागणी चिरनेर येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी केली
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List