शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरोधात बॅनर, मतदारांनी विचारले प्रश्न
लोकसभा निवडणुकीचा प्रचारात रंगत आणली आहे. आता जवळपास सर्वच ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे. परंतु प्रचार करताना वेगवेगळे अनुभव उमेदवारांना येत आहे. मतदार आता जागृत झाले असल्याचा हा परिणाम आहे. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात त्यांच्या मतदार संघात बॅनर झळकले आहेत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहे.
मतदारांची नाराजी
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिरूर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीत पुन्हा आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात करून दिली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत, अशी नाराजी आता लोकसभा मतदारसंघात नागरिकांकडून दिसू लागली आहे.
असे विचारले प्रश्न
खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हे यांचा जनतेशी पाहिजे तसा जनसंपर्क राहिलेला नाही. आता अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात प्रचार दौरा केला. या वेळी परिसरात अमोल कोल्हे यांच्या विरोधात बोलके पोस्टर लागलेले पाहावयास मिळाले. त्यात विद्यमान खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठे होता ? कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता? पाच वर्ष मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला ? असे तीन मोजके पण मार्मिक प्रश्न विचारण्यात आले आहे. खासदार साहेब उत्तर द्या, एक सुज्ञ नागरिक असे त्या बॅनरवर म्हटले आहे.
शिरुर मतदार संघात आंबेगावमध्ये लागलेल्या या बॅनरची चर्चा पाहावयास मिळत आहे. शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरोधात अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पाटील उमेदवार आहेत. दोन्ही नेत्यांनी प्रचार सुरु केला आहे.
शरद पवार यांच्या नावाने मत मागण्याचे दिवस संपले
दरम्यान आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. अमोल कोल्हे यांच्या चंदेरी दुनियेची सुद्धा शिवाजी आढळराव यांनी खिल्ली उडवली. ‘आम्ही कुठे तरी चंदेरी दुनियेत लोकांना न्यायचं आणि खोटी आश्वासने द्यायची असा प्रकार होत असल्याचा आरोप आढळराव पाटील यांनी केला. शरद पवारांना आम्ही विसरु शकत नाही. वळसे पाटलांसह मला आजही शरद पवारांबद्दल आदर असल्याची भावना आढळराव पाटीलांनी व्यक्त केली. मात्र अमोल कोल्हे शरद पवारांचे नाव घेऊनच प्रचार करत असून शरद पवार हे नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाही. शरद पवारांसोबत निष्ठा ठेवून उभा आहे, असे सांगुन मत मागणार असाल पण शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे. आता त्यांच्या नावाने मत मागण्याचे तुमचे दिवस गेलेत अशा आढळराव पाटीलांनी कोल्हे यांना खडेबोल सुनावलेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List