लोकसभेत मराठा समाज कोणाची उपटणार खूटी; मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार
गेल्या वर्षी सप्टेंबरनंतर मराठा आंदोलन राज्याच्या केंद्रस्थानी आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे राज्यात हिरो ठरले. एका सर्वसामान्य माणसाच्या या भरारीची जागतिक माध्यमांनी पण दखल घेतली. मराठा आंदोलकांच्या काही मागण्या मान्य झाल्या. तर काही मुद्यांवर सरकारने फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता. लोकसभा निवडणुकीत मतपेटीतून ही नाराजी व्यक्त होण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना वाटत आहे. तर काही जणांना ही एक मोठी खेळी वाटत आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार देण्याच्या हालचाली झाल्या. अंतरवाली सराटीत त्यानंतर बैठक झाली. त्यात मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात खल झाला. आज 30 मार्च रोजी या सर्व बैठकांचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील काय घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे
आढावा बैठकांचा सपाटा
मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. 30 मार्चपर्यंत हा अहवाल सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर याविषयीचा काय निर्णय घेण्यात आला याची माहिती जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अपक्ष उमेदवार द्यायचा, अनेक उमेदवार उभे करायचे. कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा का, की मराठा समाजाने निवडणुकीत प्रत्यक्ष उतरायचे हे लवकरच समोर येईल.
सक्रिय राजकारणात नाहीच
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच त्यांच्या काही उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या साथीने पुढे जाणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्याच्या आदल्या दिवशीच आंबेडकर आणि जरांगे यांच्यात अंतरवाली सराटीत दीर्घ चर्चा झाली. जरांगे यांनी राजकारणात उतरण्याचा सल्ला पण आंबेडकर यांनी दिला होता. हा प्रस्ताव चांगला असला तरी राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा आणि राजकारणात न येण्याचा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला आहे.
राजकारणात बहुमताची गरज
सामाजिक आंदोलनाचं अंग वेगळं असतं. तर राजकारण हे पूर्णपणे वेगळं आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. समाजकारण करताना एकमताला अधिक किंमत असते. तर राजकारणाला बहुमताची गरज असते, असं सूचक वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. आंबेडकरांसोबत जायचे की नाही, यावर आज 30 मार्च रोजी जरांगे पाटील निर्णय जाहीर करतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List