Ratnagiri News – मैत्रीणीशी बोलतो म्हणून मामाकडून भाच्याची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
भाचा मैत्रीणीसोबत बराच वेळ बोलतो या कारणातून मामाने भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली. शहरातील मिरकरवाडा खडक मोहल्ला येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण मूळचे उत्तरप्रदेश येथील रहिवासी असून ते कामासाठी रत्नागिरीत आले होते. सध्या ते खडकमोहल्ला येथील मोबाईल दुकानाच्या फर्निचरचे काम करत होते. यावेळी मैत्रीणीशी फोनवर बोलत असल्याच्या रागातून नीरज नीषाद याने आपला भाचा प्रिन्स मंगरू निषाद याची हत्या केली. फर्निचरच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या आरीने प्रिन्सची हत्या केली. यानंतर नीरज नीषाद आणि अनुज चौरासिया हे पळून गेले.
ठेकेदार रविकुमार भारती याने 112 ला फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. आरोपी पळून गेल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत रत्नागिरी रेल्वे स्थानकातून दोघांना ताब्यात घेतले. आरोपींना शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List