शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अनेकदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करताना बँकांकडून सिबील स्कोअर तपासला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही, पैसे नसल्यानं ऐन पेरणीच्या हंगामाममध्ये शेतकरी अडचणीत सापडतो. या संदर्भात आता सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबील स्कोअची मागणी होणार नाही, शेतकऱ्यांकडे सिबील स्कोअर मागणाऱ्यांवर कारवाई करणार असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आज राज्याची खरीप हंगामाची बैठक झाली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते. या वर्षी सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा सात टक्क्यांपासून ते सतरा टक्क्यांपर्यंत अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यात आवश्यक तेवढा बियाण्यांचा पुरवठा आहे, आवश्यक तेवढं खत उपलब्ध आहे. बियाणं आणि खतांचा कुठलाही तुटवडा राज्यात निर्माण होणार नाही. या काळात वारंवार बोगस बियाण्यांचे प्रकार समोर येतात म्हणून महाराष्ट्रानं पहिल्यांदाच एक प्रयोग केला आहे, केंद्र सरकारचं साथी हे एक पोर्टल आहे. या पोर्टलवर जे काही बियाणं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यामुळे या बियाण्याचं उत्पादन नेमकं कुठे झालं आहे, हे आपल्याला या माध्यमातून ट्रेस करता येतं. यामुळे बोगस बियाणं आपल्याला पूर्णपणे रोखता येणार आहे, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कीड व्यवस्थापन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे, कीड प्रादुर्भाव पिकांवर होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना बियाणं आणि खते गरजेच्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जातील असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List