‘चहा घेतला, खिचडी खाल्ली अन्…’ राज ठाकरे भेटीवर शिवसेना नेते उदय सामंत काय म्हणाले?
शिवसेना नेते उदय सामंत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. उदय सामंत यांनी अचानक झालेल्या या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मनसे आणि शिवसेना युतीबाबत चर्चा सुरु झाली. त्यामुळे या भेटीबाबत उदय सामंत यांनी माध्यमांना माहिती दिली. राज ठाकरे यांच्यासोबत अराजकीय चर्चा झाली. त्या ठिकाणी चहा घेतला, खिचडी खाल्ली अन् निघालो, असे उदय सामंत यांनी म्हटले
काय म्हणाले उदय सामंत
उदय सामंत म्हणाले, सकाळी काही कामासाठी मी या भागात आलो होतो. त्यामुळे राज ठाकरे यांना फोन केला. मी गप्पा मारण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यांनाही वेळ होता. त्यांनी होकार दिला. राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यावर अनेक विषय कळतात. विकासाबाबत माहिती मिळते. त्यामुळे ही अराजकीय भेट होती. परंतु तुमच्या मनात जी शंका आहे. ती कोणतीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगली चर्चा झाली. चर्चे दरम्यान चहा घेतला. खिचडी खाल्ली आणि निघालो.
मुंबई मनपाबाबत चर्चा झाली का? या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले, मुंबई मनपासंदर्भात चर्चा झाली असती तर मी जाहीरपणे सांगितले असते. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली असती. आजची भेट ही अराजकीय होती. आता मी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल, राज ठाकरे यांच्यासोबत झालेली चर्चा एकनाथ शिंदे यांना सांगणार? परंतु तसे काही नाही. माझी आणि राज ठाकरे यांची चौथी भेट आहे. आजच्या चर्चेत कोणतीही राजकीय खिचडी झाली नाही.
तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला? त्या प्रश्नावर उदय सामंत यांनी सांगितले की, अनेक नेते शिवसेना उबाठा सोडत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता आत्मचिंतन करायला हवा. एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे हे नेते शिवसेनेत येत आहे. राज्यभरात शिवसेनेत इनकमिंग वाढले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबाबत योग्य चर्चा झाली नसल्यामुळे दादर आणि वरळी विधानसभेमध्ये घोळ दिसून आला होता. दादर विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना शिवसेनेने सदा सर्वांकर यांना तिकीट दिले होते. त्यामुळे राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यामध्ये शाब्दीक संघर्ष दिसून आला होता. आता पुन्हा महापालिका निवडणुका चार महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपाबाबत कोणतीही चुकीची चर्चा होऊ नये, यासाठी दोन्ही राजकीय पक्ष आग्रही आहेत, असे म्हटले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List