महाविकास आघाडीत महाभूकंप… समाजवादी पार्टी आघाडीतून बाहेर पडणार?; गंभीर आरोप काय?
विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीने साथ सोडली आहे. शिवाजीनगर- मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबु असीम आझमी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही घोषणा केली आहे. तसंच यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव का झाला? यावरही अबु आझमी यांनी प्रकाश टाकला आहे.
अबु आझमी काय म्हणाले?
महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता. कोणत्याही प्रकारचा समन्वय महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत पाहायला मिळाल नाही. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकवाक्यता गरजेची आहे. कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढत असेल तर त्याला आपला नेता- उमेदवार समजलं गेलं पाहिजे. पण कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता, असं अबु आझमी म्हणालेत.
यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पराभूत का झाली? यावर आझमी यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळालं. जागा वाटपावेळी रस्सीखेच पाहायला मिळाली. याचमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असं अबु आझमी यांनी सांगितलं.
अबु आझमी यांनी शिवसेनेच्या आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कायनम असेल. सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी मांडला नाही. त्यामुळे आमचा त्या भूमिकेला विरोध आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवायचं की त्यांना शिवसेनेसोबत राहायचं की नाही, असं अबु आझमी म्हणाले आहेत.
अबु आझमी यांनी घेतली आमदारकीची शपथ
विधानसभा निवडणुकीतील निकालावर महाविकास आघाडीकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. पण अबु आझमी यांनी मात्र विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत आता फूट पडली आहे. अबु आझमी आणि भिवंडीचे आमदार रईस शेख हे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडीचं संख्याबळ 2 ने कमी झालं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List