मोठी बातमी! ठाण्याकडे निघालेले एकनाथ शिंदे वाटेतूनच पुन्हा गावी परतले, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या साताऱ्यातील मुळगावी दरेगावात आहेत. ते आज दुपारी दोन वाजता दरेगावातून ठाण्यासाठी रवाना होणार होते. मात्र त्यांनी साताऱ्यामध्ये देवीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा ते आपल्या मुळगावी परतल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांचा ताफा देखील मागे बोलावण्यात आला आहे. दरम्यान आता एकनाथ शिंदे हे साडेतीन वाजता ठाण्याला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपद आणि महसूल मंत्रिपदासाठी अग्रही आहेत. मात्र दुसरीकडे भाजप देखील गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नसल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल 230 जागा महायुतीने जिंकल्या, 132 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. दरम्यान बहुमत मिळून देखील अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेंन्स कायम आहे. येत्या पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी अग्रही आहेत, जर गृहमंत्रिपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार अशी त्यांची भूमिका आहे. जर शिवसेनेला गृहमंत्रिपद मिळालं नाही तर शिवसेना शिंदे गटातील दुसरा एखादा ज्येष्ठ नेता उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच ते आपल्या साताऱ्यातील मुळगावी दरेगाव इथे गेल्यानं चर्चेला आणखी उधाण आलं, मात्र भाजपकडून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं वृत्त फेटाळून लावण्यात आलं आहे. शिंदे बिलकूल नाराज नाहीत, या बातम्या केवळ प्रसारमाध्यमांमधून चालवल्या जात आहेत. ते जर आपल्या मुळगावी गेले असतील तर त्यात शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List