जागावाटपासाठी मविआची 10 तास खलबतं; ठाकरे गटाची तातडीची बैठक; राऊत म्हणाले….
विधानसभेच्या जागावाटपासाठी काल महाविकास आघाडीची 10 तास बैठक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर माझी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आज साडे बारा वाजता आज शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, असं संजय राऊत म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी भाजप आणि विशेषत : अमित शाह यांच्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.
मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक
परवा दिवशी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता. विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात विदर्भातील जागांवरून वाद झाला आहे. त्यानंतर आता काल 10 तास बैठक झाली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आता या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
राष्ट्रपती राजवट लावून सरकार चालवण्याचा डाव- संजय राऊत
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यावरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे. निवडणुकीनंतर सरकार बनवण्यासाठी केवळ दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. उशीर झाल्यास हे लोक राज्यात सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावतील. राष्ट्रपती राजवट लावून सरकार चालवण्याचा अमित शाह यांचा डाव आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List