पळून पळून कुठे जाणार होता?; जयदीप आपटेला अटक होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करण्यात आली आहे. काल उशिरा त्यांना अटक करण्यात आली. त्यांना सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या अटकेमुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कारण जयदीप आपटे हे गेल्या 11 दिवसांपासून फरार होते. पोलिसांच्या सात टीम त्यांना शोधत होत्या. या पार्श्वभूमीवर ही अटक महत्त्वाची मानली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपटे पळून पळून कुठे जाणार होता? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पळून पळून कुठे जाणार आहे? गृहखातं आहे. त्याची चौकशी होईल. कारवाई होईल. त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
त्यांना गल्लोगल्ली फिरावं लागतंय
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. बाळासाहेब असताना मोठमोठे नेते दिल्लीपासून देशभरातून येत होते. आता यांना दिल्लीतील गल्ली गल्लीत जावं लागत आहे. मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा असं म्हटलं जात आहे. मला काही तरी करा. माझं नाव नक्की करा. ही दुर्देवी बाब आहे. बाळासाहेबांना दु:ख होत असेल. बाळासाहेबांचे विचार सोडल्यावर असं होतं. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत. कल्याणकारी योजना आखत आहोत. विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आता दुर्देवी चित्र पाहतोय, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
नंबर एकवर आलोय
राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. आपण नंबर एक होत आहोत. आपले सरकार आले तेव्हा आपण दोन आणि तीन नंबरवर होतो. पण सरकारने असं काम केलं की आपण नंबर एकवर आलो आहोत. आज बड्या कंपन्या आणि उद्योजकांकडून महाराष्ट्राला पसंती दिली जात आहे. आतापर्यंत आपण 5 कोटींच्या उद्योगांचे एमओयू केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हे देणारं सरकार
यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर नाराजी व्यक्त केली. एसटी संपावर मी नाराज झालो. गणेशभक्तांना वेठीस धरणे बरोबर नाही, काल बैठक घेतल्यावर त्यानी संप मागे घेतला. जो शब्द दिला तो पाळणार. शब्द फिरवणारे हे सरकार नाही तर हे देणारे सरकार आहे, असंही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List