भाजपचं आंदोलन शिवरायांच्या विरोधात, फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक; आंदोलनाआधी संजय राऊतांचा हल्लाबोल
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट आहे. महाविकास आघाडी आज मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया जोडे मारो आंदोलन करणार आहे. याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे व्हिलन आहेत. खलनायक आहेत. फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फक्त राजकीय प्रेम वाटतं. शिवरायांचा महाराष्ट्र तोडण्यासाठी, विदर्भ वेगळा करण्यासाठी लग्न न करण्याची शपथ त्यांनी घेतली होती. पुतळा पडला बर झाला म्हणतात तेव्हा निषेधाचा एक शब्द काढत नाहीत. फडणवीसांच्या काळाइतका शिवरायांचा अपमान मोगल, ब्रिटीशांनीही झाला नाही, असं संजय राऊत म्हणाले.
फडणवीसांवर निशाणा
भाजपला आंदोलन करू द्या…. आमचं आंदोलन शिवरायांच्या सन्मानात आहे. तुम्ही जे भ्रष्टाचार केला तर त्याविरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून आंदोलन नाही करू शकत का? शिवरायांसाठी आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरली आहे. आम्ही शिवरायांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरतोय. तर भाजप आमच्या विरोधात म्हणजे शिवरायांच्या विरोधात आंदोलन करत आहे. फडणवीसांना काय इतिहास माहिती कोण आहे? भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं बोलत होते. तेव्हा तुम्ही गप्प होता. आता तुम्ही बोलता आहात, असं संजय राऊत म्हणालेत.
अटक करा, तरी आंदोलन करणारच- राऊत
आज सकाळी 11 वाजता शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, हे आंदोलनस्थळी पोहचतील. मग आमचं आंदोलन सुरू होईल आणि महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहिलं. अडवू दे अटक करू दे, आमच्या बसेस थांबवण्याचा प्रयत्न सकाळपासून सुरु आहे. मुंबईत मुद्दामहून मेगाब्लॉक वाढवला आहे. कार्यकर्ते आंदोलनाला पोहचू नयेत. म्हणून मेगा ब्लॉक केलाय. आमच्या वाहनांना अनकाऊट केल्या जात आहे. एवढं भय, एवढी भीती… तुम्हाला महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
मालवणचा पुतळा कोसळला हा मोठा भ्रष्टाचार आहे. आपल्या लोकांना दिलेल्या कामांतील स्पर्धेतून हा भ्रष्टाचार झाला. मोदी, शिंदेंच्या माफीने हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राला सरकार थांबवू शकत नाही. लोकशाहीत आंदोलनाला परवागनगी द्यावीच लागेल. रविवार आहे. त्या भागातील कार्यलयांना सुट्टी आहे. तरीही आम्हाला परवानगी देत नाही. आम्ही तरी किमान जोडे मारतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता, असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List