घडामोडींना प्रचंड वेग… मातोश्रीवर तातडीची बैठक; मोठी रणनीती ठरणार?

घडामोडींना प्रचंड वेग… मातोश्रीवर तातडीची बैठक; मोठी रणनीती ठरणार?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दुर्देवी घटना घडत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील गुन्ह्यांची प्रकरणं सारखी बाहेर येत आहेत. त्यामुळे राज्यात रोषाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे मालवणमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राज्यात या घटनांवर संताप व्यक्त केला जात आहे. हा संताप व्यक्त केला जात असतानाच महाविकास आघाडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ही तातडीची बैठक बोलावली आहे. खुद्द शरद पवार हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले आहेत.

महाविकास आघाडीने आज ‘मातोश्री’ निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या गंभीर घटना, राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसेच याबाबत महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि दिशा ठरवली जाणार आहे.

या मुद्द्यांवर चर्चा

राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यासोबतच बदलापूरमधील घटना, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार याबाबत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते चर्चा करणार आहेत. मालवणात शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला हा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे अवघ्या आठ महिन्यांत कोसळला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीत या सगळ्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उद्धव ठाकरे बोलणार?

दरम्यान, या बैठकीनंतर उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे नेते मीडियाशी संवाद साधण्याची शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीकडून काय भूमिका व्यक्त केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. थेट पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला पुतळाच पडल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच या बैठकीला अत्यंत महत्त्व आलं आहे.

मोठं आंदोलन उभारणार?

या घटनांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यात मोठं आंदोलन उभारलं जाऊ शकतं असंही सांगितलं जात आहे. आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील आज मालवणमध्ये आहेत. त्यांच्या नेतृत्वात मोर्चा सुरू झाला आहे. तर दुसरीकडे संजय राऊत हे परवा मालवणमध्ये जाणार आहेत. त्यामुळे मालवणच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी अत्यंत गंभीर झालेली दिसत आहे.

जनतेच्या असंतोषाबाबत चर्चा सुरू 

या बैठकीत राज्यसरकारवरील जनतेच्या असंतोषाबाबत चर्चा सुरू आहे. बदलापूर घटनेसह राज्यात वाढते बाल लैंगिक अत्याचार, पुण्यात पोलिसांवर कोयता गँगचा हल्ला, मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळणे यासह बिघडलेली कायदा सुव्यवस्था यावरही चर्चा होत आहे. राज्य सरकारविरोधात जनतेत असंतोष पसरला असून त्यावर सरकारविरोधात आक्रमक होण्यासंदर्भात रणनिती आखण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

तसेच आगामी विधासभा निवडणुकांसाठी मुंबईतील जागावाटप काही जागांवरून अडले आहे. यावर मविआच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होवून मार्ग काढला जाईल. जागा वाटपास विलंब होऊ नये अन्यथा प्रचाराला वेळ कमी मिळेल अशीही चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागावाटप चर्चेला विलंब होतोय, ते लवकर होण्यासाठी रोडमॅप तयार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;