Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मुंबईत पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदेंमध्ये सामना, विधानसभेसाठी जागावाटप निश्चित? पाहा Video
लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणारय. दरम्यान विधानसभेसाठी मविआत ठाकरे गट आणि शरद पवार गटाचं जागावाटप निश्चित झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. मात्र, या जागावाटपात सर्व पक्षांचं लक्ष आहे त्या मुंबईतील 36 जागांवर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असलेल्या मुंबईतील 36 जागांपैकी 25 जागा ठाकरे गट लढवण्याच्या तयारीत आहे.
मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.. त्यामुळे मुंबईतील जास्तच जास्त जागा लढवाव्यात अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलीय. दरम्यान ठाकरे गटाकडून कोणत्या 25 जागांवर लढण्याची तयारी सुरुय. त्यावर एक नजर टाकुयात. १)शिवडी २)भायखळा ३)वरळी ४)माहीम ५)चेंबूर ६)भांडुप पश्चिम ७)विक्रोळी ८)मागाठाणे ९)जोगेश्वरी पूर्व १०)दिंडोशी ११)अंधेरी पूर्व १२) कुर्ला १३) कलिना १४)दहिसर १५)गोरेगाव १६)वर्सोवा १७)वांद्रे पूर्व १८)विलेपार्ले १९)कुलाबा २०)वडाळा २१) चांदीवली २२)बोरिवली २३)मलबार हील २४) अनुशक्ती नगर २५) मानखुर्द शिवाजीनगर
2019 विधानसभेचा विचार केल्यास केलास शिवसेनेनं मुंबईत चांगली कामगिरी करत 14 जागांवर विजय संपादन केला. मुंबईत 2019च्या विधानसभेत युतीत असताना 36 पैकी शिवसेनेनं 19 जागा लढवल्या त्यातील 14 जागांवर सेनेनं विजय मिळवला. त्यातील 8 आमदार ठाकरेंकडे आहेत. तर 6 आमदार शिंदे गटात आहेत. दरम्यान भाजपनंही 17 जागा लढवल्या होत्या. त्यातील 16 जागांवर भाजपनं विजय मिळवला. तर उर्वरित 6 जागांवर काँग्रेसनं 4 जागा, राष्ट्रवादीनं 1 आणि समाजवादी पार्टीनं 1 जागा जिंकली होती. तर मानखुर्द-शिवाजीनगर, अनुशक्तीनगर, बांद्रा पूर्व, धारावी आणि मुंबादेवी या 5 विधानसभेच्या जागांवर ठाकरे गटाचा पराभव झाला होता.
मुंबईत शिवसेनेची मोठी ताकद आहे. एक संघटना म्हणून शिवसेना मुंबईत तळागळापर्यंत पोहोचलीय. मात्र, शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत गेलेत. एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत आमदारांची एक मोठी फळी देखील नेली. ठाणे आणि मुंबईत एकनाथ शिंदेंनी ग्राऊंड लेव्हलवर केलेल्या कामामुळे ठाकरे गटाची मुंबईतील ताकद कमी होणार अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की मुंबई हा ठाकरेंचाच बालेकिल्ला आहे.
ठाकरे गटानं लोकसभेत 4 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 3 जागा त्यांनी जिंकल्यात तर उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर केवळ 48 मतांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांचा पराभव झाला. मुंबई हा ठाकरे गटाचा गड आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं भाजप आणि शिंदे गटाला जोरदार टक्कर देत. मुंबईत आपला झेंडा फडकवला. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभेत मुंबईतील 36 जागांपैकी 25 जागा लढवण्याची ठाकरे गटाची तयारी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List