पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला, अखेर भाजपकडून पुनर्वसन
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला आहे. लोकसभेतील पराभवानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.भाजपमध्ये विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छूक होते. परंतु या पाच जणांनी बाजी मारली आहे.
पंकजा मुंडे पाच वर्षांपासून राजकीय वनवासात
भारतीय जनता पक्षात पंकजा मुंडे दीर्घकाळापासून राजकीय सत्तेच्या वर्तुळाबाहेर होत्या. गेल्या पाच वर्षांपासून त्या सक्रीय राजकारणातून बाहेर होत्या. २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून पक्षात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु त्यानंतर त्यांना पक्षाकडून लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली नव्हती. आता त्यांना नुकतीच लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. परंतु बजरंग सोनवणे यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे दिल्लीचे उघडलेली दार त्यांचे बंद झाले. त्यानंतर पुन्हा पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. अखेर आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता खासदार नाही तर आमदार पंकजा मुंडे होणार आहे.
मंत्रीपद मिळणार का?
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळणार का? यावर चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पंकजा मुंडे सारखा ओबीसी चेहरा राज्यात भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
BJP announces the names of candidates for the Maharashtra Legislative Council biennial elections
Pankaja Munde also announced as party’s candidate for MLC elections pic.twitter.com/B3ijp0ZdCX
— ANI (@ANI) July 1, 2024
पंकजा मुंडेंच्या माध्यमातून भाजपचे ओबीसी गणित
पंकजा मुंडे यांचे समर्थन करणारा राज्यात मोठा वर्ग आहे. तसेच त्यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला पराभवाचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू नये, यासाठी भाजपकडून पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच ओबीसी मते भाजपकडे वळवण्यासाठी पंकजा मुंडे यांना संधी दिली गेली आहे. त्यासाठी विधान परिषदेच्या 13 जुलैला होणाऱ्या 11 जागांसाठी निवडणुकीत भाजपने पाच उमदेवार जाहीर केले आहे. भाजपचे सध्याचे संख्याबळ पाहता हे पाचही उमेदवार निवडून येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List