अरविंद केजरीवाल प्रकरणात कोर्टाची ईडी, सीबीआयला चपराक- संजय राऊत
शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला. अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर होती, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. त्यांची कोर्टाने मुक्ताता केली आहे. यापूर्वी माझी आणि अनील देशमुख यांची अटक कोर्टाने बेकायदेशीर ठरवली होती. या तिन्ही प्रकरणातून मोदी सरकार तपास संस्थांचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी करत आहे, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे जनतेने मोदी यांना बहुमत दिले नाही. आता हे सरकार टेकूवरचे सरकार आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मोदींचा योगा दहा वर्षांपासून देश पाहत आहे
राज्यात कोयता गँग सक्रीय आहे. या सरकारमध्ये त्यांना पाठिंबा देणारे लोक आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मोदी यांनी योगा केला. त्यांचा हा योगा देश पाहणार आहे. देश गेल्या दहा वर्षांपासून तेच पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी योगा केला. उपमुख्यमंत्र्यांनी योगा केला. चांगली गोष्ट आहे, असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावला.
यामुळे केजरीवाल यांना अटक
अनिल देशमुख, संजय राऊत असो की अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे जनता होती. अरविंद केजरीवाल यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांना यश मिळू दिले नाही, त्यामुळे खोट्या प्रकरणाची उभारणी करुन त्यांना अटक केली.
गेल्या काही वर्षांत देशात डोंबारीचा खेळ सुरु आहे. त्यात अनेक विरोधकांना अटक केली आहे. गेल्या दहा वर्षांत घटनात्कम संस्था मोदी, शाहाच्या कठपुतली बाहुल्या झाल्या होत्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना बहुमतावरुन जनतेने खाली खचले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांचे शिवसेना उबाठाकडून आम्ही अभिनंदन करतो. त्याच्या सुटकेमुळे ईडी अन् सीबीआय सारख्या संस्थांना चपराक आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List