शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा लोकसभेवरील विजय मॅनेज, दोन पक्षांची थेट पोलिसांकडे तक्रार
लोकसभा निवडणुकीची सर्व प्रक्रिया संपली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आले आहे. एनडीमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळाही झाला आहे. या निवडणुकीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून रणधुमाळी सुरु होती. आरोप-प्रत्यारोप होत होते. राज्यात मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकाल सर्वाधित चर्चेत राहिला. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात चुरशीची लढाई झाली. या मतदार संघात इव्हीएम मशिनमधील मतमोजणीत रवींद्र वायकर फक्त एका मताने आघाडीवर होते. परंतु पोस्टल बॅलेटमध्ये त्यांना 47 मतांची मदत झाली आणि त्यांनी अमोल किर्तीकर यांना 48 मतांनी पराभूत केले. परंतु त्यांच्या या विजयावरुन अजूनही वाद सुरु आहे. आता दोन पक्षांनी त्यांचा विजय मॅनेज असल्याचा आरोप करत थेट पोलीस ठाणे गाठले आहे.
कोणी केला आरोप
शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज आहे, असा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार केली आहे. आपल्यासोबत अपक्ष उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मतमोजणी केंद्रांवर मोबाईलसाठी बंदी होती. त्यानंतर केंद्रावर रवींद्र वायकर यांच्या गटाकडून मोबाईल वापरला, असा आरोप या दोन्ही उमेदवारांनी केला आहे. या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ठाकरे गटाकडून आक्षेप
रवींद्र वायकर यांच्या विजयावर यापूर्वी शिवसेना उबाठाकडून आक्षेप घेण्यात आला होता. या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी शिवसेना उबाठाकडून करण्यात आली. आता आणखी दोन पक्षांनी या विजयासंदर्भात आरोप केले आहे. यामुळे रवींद्र वायकर यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत रवींद्र वायकर
शिवसेनेचे रवींद्र वायकर यांची राजकीय कारकीर्द नगरसेवक म्हणून सुरु झाली. 1992 मध्ये प्रथम ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर सलग चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते. 2006-2010 या काळात त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. 2009, 2014 आणि 2019 सलग तीन टर्म जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून ते विधानसभेवर गेले. 2014 साली शिवसेना भाजपा सरकार आले तेव्हा त्यांनी गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List