Loksabha Election Result: मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरने केला भाजप-सेनेचा धुव्वा, विदर्भात आठ जागा गमवल्या
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात चांगला धक्का बसला आहे. आता भाजप आणि राजकीय विश्लेषक यावर विचारमंथन करतील. पराभवाची कारणे समोर येईल. परंतु मराठवाड्यातील आठ मतदार संघात भाजपचा धुव्वा उडाला. मराठवाड्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्वाचे कारण मनोज जरांगे फॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून सुरुवात केली. अंतरवली सराटीत त्यांनी उपोषण केले. त्यांच्या उपोषणस्थळी लाठीमार झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले. मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केले. परंतु त्यांची सगेसोयऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसला.
मराठवाड्यात यांनी घेतली आघाडी, पंकजा मुंडे…
बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांची आघाडी आहे. परंतु काही फेऱ्यांमध्ये त्या पिछाडीवर होत्या. संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांनी आघाडी घेतली आहे. मराठवाड्यातील हे दोन मतदार संघ वगळता इतर सर्व ठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव झाला. मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला चांगलेच यश मिळाले. जालनामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे, काँग्रेस शिवाजीराव काळगे (लातूर), नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण, हिंगोली ठाकरे गटाचे नागेश पाटील, धाराशिव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, परभणी ठाकरे गटाचे संजय जाधव आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे जालनामधून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आतापर्यंतचा कलानुसार समोर येत आहे.
मराठवाड्याप्रमाणे विदर्भातील निकाल भाजपसाठी धक्कादायक राहिले. विदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. परंतु विदर्भातील दहा जागांपैकी बुलढाणा आणि नागपूर वगळता इतर सर्व ठिकाणी महायुतीचा पराभव झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभाही झाल्या होत्या. त्या सभांना चांगली गर्दी होती. परंतु ही गर्दी मतांमध्ये परावर्तीत झाली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List