‘उखाड दिया’, मुंबई फक्त ठाकरेंचीच, 100 टक्के विजय, नेमका निकाल काय?

‘उखाड दिया’, मुंबई फक्त ठाकरेंचीच, 100 टक्के विजय, नेमका निकाल काय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला सांभाळण्यात मोठं यश आलं आहे. मुंबईत 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. केवळ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा विजय झाला आहे. उत्तर मुंबईची जागा वगळता मुंबईतील इतर सर्व जागा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली आहेत. विशेष म्हणजे उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स राहिला. अतिशय अटीतटीची लढत या ठिकाणी झाली. अखेर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला. तर भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला.

विशेष म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. आगामी काळात या निवडणुका लवकर होतात का? ते स्पष्ट होईल. पण मुंबई महापालिकेची निवडणूक न झाल्यामुळे मुंबईत कुणाची ताकद आहे? हे स्पष्ट होणं कठीण होतं. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मुंबईत नेमकी कोणत्या राजकीय पक्षाची ताकद आहे, हे निवडणुकीशिवाय समजणार नव्हतं. खरंतर मुंबई आणि शिवसेना यांचं एक वेगळं समीकरण राहिलेलं आहे. पण शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईत यश मिळतं का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुंबईत शिवसेना पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणूक ही मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत ठाकरेंनी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाला चारी मुंड्या चित केलं आहे. मुंबईत एकूण सहा लोकसभेच्या जागा आहेत. या सहा पैकी 4 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार होते. या चारही जागांवर आपल्या उमेदवारांना विजयी करण्यात उद्धव ठाकरे यांना मोठं यश आलं आहे.

मुंबईच्या सहा जागांवरचा निकाल नेमका काय?

  1. दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हे उमेदवार होते. तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव या उमेदवार होते. या ठिकाणी अरविंद सावंत हे घवघवीत मतांनी विजयी झाले आहेत.
  2. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून राहुल शेवाळे हे उमेदवार होते. विशेष म्हणजे ते तिथले विद्यमान खासदार होते. तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे उमेदवार होते. या मतदारसंघात अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे.
  3. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रविंद्र वायकर उमेदवार होते. तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर उमेदवार होते. अमोल कीर्तिकर यांचा विजय झाला आहे.
  4. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाची लढत ही अतिशय अटीतटीची ठरली. अखेर अंतिम क्षणी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा या मतदारसंघात विजय झाला.
  5. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला आहे.
  6. मुंबईतील केवळ एका जागेवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय झाला आहे.

ज्यांनी ठाकरेंचे खासदार फोडले तेच पराभूत

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर मुंबईच्या मतदारांनी मतदानातून प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेचे 40 आमदारांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचं बंड यशस्वी ठरल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे खासदार फोडले होते. राहुल शेवाळे तब्बल 13 खासदार शिंदे गटात घेऊन गेले होते. विशेष म्हणजे त्यांनी लोकसभेचं गटनेतंपद मिळवून घेतलं होतं. तर भावना गवळी यांना मुख्य प्रतोद केलं होतं. राहुल शेवाळे हे कधीकाळी मुंबईत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना खासदारकीचं तिकीट देवून त्यांचं भवितव्य उज्ज्वल केलं होतं. पण नंतर घडलेल्या घडामोडींमध्ये शेवाळे यांनी ठाकरेंकडे पाठ फिरवली होती. या सर्व घडामोडींवर आता मतदारांनी मतदानातून प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;