नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह, फडणवीसांनी रसद पुरवली; संजय राऊतांचे सनसनाटी आरोप
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप केला आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर संजय राऊतांनी भाष्य केलंय. भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले. गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. सामनाच्या रविवार विशेष ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊतांनी मोठा आरोप केला आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची राजवट ४ जूननंतर संपत आहे. याबाबत आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. या दोघांना सत्तेवरून दूर करण्यासाठीच देशातील जनतेने मतदान केले. मोदी व शहा यांनी देशाचा तुरुंग केला व लोकशाहीलाच बंदिवान केले. त्यामुळे मोदी-शहांचा पराभव होऊ शकत नाही असा भ्रम निर्माण झाला. मोदी हे देवाचे अवतार आहेत असे चित्र निर्माण केले. त्यामुळे घरात अन्न, वीज, पाणी, रोजगार, निवारा नाही, पण मोदी हवेत.
“माती खाऊन जगू” असे बोलणारे अंधभक्त या काळात दिसले, पण ज्यांनी आतापर्यंत मोदींना मतदान केले तो शेतकरी, कष्टकरीच मोदींच्या विरोधात उभा ठाकला. मोदी यांनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केले. त्यांनी देशाला गुलाम केले व दहा वर्षांत गुलाम जन्माला घातले. तरीही गुलाम बंड करतोच. रशिया ज्याने शक्तिमान केला तो जोसेफ स्टालिन, स्टालिनच्या मृत्यूपूर्वी काही दिवसच भारताचे हायकमिशनर श्री. के. पी.एस. मेनन यांना स्टालिनची भेट मिळाली होती. स्टालिन त्यांना म्हणाला, “आमचा शेतकरी
साधा माणूस आहे. लांडगा अंगावर आला. तर तो त्याला उपदेश करीत नाही, सरळ ठार करतो! लांडग्याला हे समजते व तोही. त्यामुळे अंगावर येत नाही.” भारताच्या शेतकऱ्याने तेच केले आहे.
सत्ता सोडतील काय? निवडणुका जवळ जवळ संपल्या आहेत व ४ जूननंतर काय? यावर चर्चा सुरू आहेत. मोदी व शहा यांचा पराभव झाला तरी ते सहज सत्ता सोडणार नाहीत. एखाद्या हुकूमशहाप्रमाणे ते सत्ता सोडण्यास नकार देतील असे बोलले जाते ते खरे नाही. ४ जूनच्या दुपारनंतर देशात राज्यघटनेला उभारी मिळेल, लष्करप्रमुख, पोलीस, प्रशासन यांचे प्रमुख मोदी-शहांचे काहीएक ऐकणार नाहीत. या सर्व संस्था गुलामीच्या बेड्या तोडून टाकतील. “ये लोक कब जा रहे है?” अशीच भावना यापैकी प्रत्येक जण खासगीत व्यक्त करत होता.
ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला नाही व अमेरिकेच्या संसदेत त्यांचे भाडोत्री लोक घुसवून गोंधळ घातला. असा काही प्रकार मोदी-शहांचे लोक करतील काय? असे काहीच करण्याचे बळ त्यांच्याकडे राहणार नाही. या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागेल. कारण कोणताही अतिरेकी प्रयोग केल्यास शांत डोक्याने क्रांती करणारा मतदार खवळून रस्त्यावर येईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List