लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर मोठी अपडेट, काय घडणार?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी दिल्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावलं आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. संबंधित प्रकरण कोर्टात अजूनही प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडून आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात मोठं बंड पुकारलं. यानंतर त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत महायुतीचं सरकार घडवून आणलं. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट केंद्रीय निवडणूक आयोगातील कायदेशीर लढाई जिंकली. तर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेऊन निकाल देण्याचे आदेश दिले.
यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ठाकरे गटाला मान्य नसल्याने ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात गेला. तर दुसरीकडे शिवसेनाही ठाकरे गटाचे आमदार अपात्र का नाहीत? या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. दोन्ही गटांच्या याचिकांचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. याच प्रकरणाबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
शिवसेना आमदार अपात्र प्रकरण, तसेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या म्हणजे 14 मे ला सुनावणी होणार होती आणि निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्या प्रकरणी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर 17 मे ला सुनावणी होणार होती. मात्र आता या दोन्ही प्रकरणांची सुनवणी जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निकाल लागणार?
या आठवड्यात सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे ब्राझील दौऱ्यावर जाणार असल्याने ते कामकाजात नसतील. या दोन्ही प्रकरणाच्या सुनावण्या CJI यांच्या पिठासमोर होत्या. मात्र ते सुट्टीवर असल्याने या सुणावण्या होणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी निकाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निकाल आल्यानंतर काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List