आधी आमदारकीचा राजीनामा द्या, मगच प्रचारात या; गिरीश महाजन यांनी नाथाभाऊंना सुनावले
आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना निवडून देण्याचं आवाहन खडसे करत आहेत. मात्र, खडसेच्या या कृतीवर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खडसे यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावे. राजीनामा न देता भाजपचे काम करत असल्याने लोकांमध्ये गैरसमज होत आहे, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना सुनावले आहे.
गिरीश महाजन शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधत असताना त्यांनी नाथाभाऊंना लक्ष केलं. एकनाथ खडसे कधी महणातात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे आहेत. यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.
उशीर झाला, पण जागा वाटप झालं
गिरीश महाजन यांनी यावेळी महायुतीच्या जागा वाटपावरही त्यांनी भाष्य केलं. महायुतीचे जागा वाटप पूर्ण झालं आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यासाठी उशीर झाला. नाशिक, ठाणे यासर्व जागा महायुतीच जिंकणार आहे. मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचंय हे लोकांनी ठरवलंय, असं महाजन यांनी सांगितलं.
तुम्ही काय केलं ते आधी पाहा
यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लखवा मारलाय असे शरद पवार म्हणाले होते. आज त्याच पवारांसोबत पृथ्वीराजबाबा फिरत आहेत. आपण मुख्यमंत्री असताना काय केलं हे आधी बघा. मोदी जगमान्य नेते आहेत. चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून ही अपेक्षा नाही, अशी टीका त्यांनी केली.
ठाकरेंची चूक अक्षम्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भरभरून भाष्य केलं. त्यावरही महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ऋणानूबंध होते. आम्ही सन्मानाने मातोश्रीवर जायचो. आता उद्धव ठाकरेंना दररोज तीन ठिकाणी फिरावे लागते. कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसच्या ऑफिसला जावे लागते. उद्या प्रकाश आंबेडकरांनी बोलावले तर त्यांच्याही ऑफिसला जावे लागेल. उद्धव ठाकरेंनी इतकी वाईट स्थिती ओढवून घेतली. मोदीजी राजकीय नाही तर वैयक्तिक कामात ठाकरे कुटुंबाला मदत करतील. मात्र उद्धव ठाकरेंनी केलेली चूक अक्षम्य आहे. त्याचा फटका त्यांना बसणार आहे, असंही ते म्हणाले.
आता दाढ्या कुरवाळण्याचं काम
आमच्या खिडक्या, दरवाजे तुमच्यासाठी उघडे नाहीत. तुम्हाला लोकांनीच बाहेर हाकललयं. आज तुमचं अस्तित्व काय?. या बहादरामुळे शिवसेना गेली. आमच्याबरोबर निवडून आलात आणि गद्दारी केली. मोदींच्या सभेमुळे तुमच्या जागा निवडून आल्या. निवडून आल्यावर इतक्या वर्षांच्या संबंधांना तिलांजली दिली. आता काँग्रेससाठी मतदान मागताय. तुमची विश्वासार्हता आणि तुमचं हिंदुत्व संपलं. आता फक्त इतरांची दाढी कुरावळण्याचे काम सुरू आहे, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List