Sanjay Raut : जो माणूस घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नाही… मोदींवर संजय राऊतांचा हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीत अनेक मुद्यांवरुन वातावरण तापले आहे. आरोपांच्या फैरी झडत आहे. सर्वच मुद्यांची जी काही सरमिसळ झाली आहे. त्यामध्ये आता मंगळसूत्राने निवडणूकीची सूत्र हाती घेतल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपासून देशासह राज्यात सौभाग्याचं लेणं निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहे. खासदार संजय राऊत यांनी पण याच मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यात काँग्रेस आई-बहिणींचे मंगळसूत्र पण शिल्लक ठेवणार नाही, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय म्हणले संजय राऊत
पंतप्रधानांच्या मंगळसूत्रवरील वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनी पण त्यांच्या वक्तव्याचा तिखट समाचार घेतला. नरेंद्र मोदी बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालत आहेत, जो माणूस घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नही त्यांनी इतरांची उठाठेव करु नये, अशी जहरी टीका त्यांनी केली. मणिपूरला किती महिलांची मंगळसूत्र गेली त्याला जवाबदार मोदी असल्याचा घणाघात सुद्धा त्यांनी घातला. त्यांच्या या टीकेनंतर राज्यात पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
राम मंदिर आंदोलनात हे कुठे होते?
अयोध्यात जेव्हा आंदोलन सुरु होत तेव्हा हे डरपोक कुठे होते,रामाच्या साहाय्याने हे निवडणुका जिंकायला बघत आहेत, त्यांची शेवटची फडफड सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर केली. देशात हे आंदोलन असतांना शिवसेना त्या आंदोलनात उतरली होती. अमित शहाच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होत कि हे कृत्य शिवसेनेने केलं होत तेव्हा बाळासाहेबांनी त्याची जवाबदारी घेतली होती, तेव्हा अमित शहा तरी होते का, असा टोला ही त्यांनी लगावला.
ही तर साखर कारखान्यांना लाचच
साखर कारखान्यांना निवडणुकीच्या आधी दिलेला निधी म्हणजे लाच असल्याचा आरोप त्यांनी केला. साखर कारखान्यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच कसा निधी देण्यात आला, यावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला पण कटघऱ्यात उभे केले. आता कुठे आहे निवडणूक आयोग, असा सवाल त्यांनी केला.
शिंदे-पवार यांच्यावर टीका
4 जूननंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येईल. त्यानंतर एकनाथ शिंदे गट पूर्णपणे संपलेला असेल, त्यांचा एकही खासदार निवडून येत नाही, अजित पवार आणि एकनाथ शिंदे संपलेले असतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List