Raj Thackeray : ‘रामाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम….’, राम नवमीच्या शुभेच्छा देताना राज यांचा कोणावर निशाणा?
आज देशात श्रीराम नवमीचा उत्साह आहे. सर्वत्र उत्साहात राम नवमी साजरी होत आहे. यंदाची राम नवमी देशासाठी खास आहे. कारण अयोध्येत प्रभू रामचंद्रांच भव्य मंदिर उभ राहिल्यानंतर ही पहिलीच राम नवमी आहे. शेकडो वर्षानंतर देशवासियांच राम मंदिराच स्वप्न साकार झालं. आजच्या या पवित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशवासियांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राम नवमीच्या या शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी एक सूचक राजकीय भाष्य देखील केलं आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पोस्ट केलेल्या संदेशातील दोन ओळीतून राजकीय अर्थ निघतो. राज ठाकरे यांचा रोख काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीकडे आहे.
“भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली. ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम.
भारतासारख्या खंडप्राय… pic.twitter.com/1sMu2KyZth— Raj Thackeray (@RajThackeray) April 17, 2024
दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळणार का?
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तो लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. पण राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करु शकतात. महायुतीच्या प्रचारासाठी ते सकारात्मक सुद्धा आहेत. दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळेल अशी चर्चा होती. कारण हा मराठी बहुल भाग आहे. महायुतीकडून मनसेने ही जागा लढवल्यास ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढू शकतात. दक्षिण मुंबईतून महायुतीने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List