ठाणे भाजपसाठी महत्त्वाचे; फडणवीसांच्या वक्तव्याने मिंध्यांना घाम
राजकीयदृष्ट्या ठाणे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे असून या विभागात मोठ्या प्रमाणात आमचे कार्यकर्ते आहेत. जनताही भाजपच्याच पाठीशी असून भविष्यात हे काम वाढणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे मिंध्यांना मात्र घाम फुटला असून पुढे काय होणार याच्या भीतीने त्यांची धाकधूक वाढली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून मिंधे उमेदवार देणार की भाजप यावर चर्चेची पारायणे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ठाण्यात भाजपचाच उमेदवार उभा करायला हवा, अशी मागणी स्थानिक पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आहे. अजून उमेदवार जाहीर झाला नसताना ठाण्यातील रेमंड मैदान परिसरात भाजपने दुमजली भव्य कार्यालय थाटले आहे. त्याचे उद्घाटन करण्यासाठी मंगळवारी देवेंद्र फडणवीस आले होते.
मित्रपक्षही सोबत
उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे मिंध्यांना जणू इशाराच दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ठाणे विभागात भाजपचे काम सातत्याने वाढत आहे. भविष्यातदेखील कामाचा वेग वाढणार असल्याने येथे प्रशस्त कार्यालयाची गरज होती. त्यांच्या या सूचक वक्तव्यामुळे मिंधे गटात मात्र चलबिचल सुरू झाली आहे. भाजपचे चांगले काम सुरू असून मित्रपक्षदेखील वारंवार आपल्यासोबत आहेत. सर्वच ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List