ठाण्यात संजीव नाईक जोमात, मिंधे कोमात; भाईंदरमधून फुंकले रणशिंग, आपणच संभाव्य उमेदवार असल्याचे केले जाहीर
भाजपने कोंडी केल्याने ठाणे लोकसभेत मिंध्यांना अजूनही उमेदवार मिळत नसताना आता माजी खासदार व भाजप नेते संजीव नाईक यांनी थेट प्रचाराचा नारळ फोडला आहे. भाईंदरमध्ये भाजपच्या आजी-माजी पदाधिकारी तसेच रहिवाशांची बैठक घेत संजीव नाईक यांनी 99 टक्के मीच उमेदवार असेन असे ठासून सांगितले. तसेच पक्षानेच आपल्याला त्यासाठी हिरवा कंदील दिला आहे असेही त्यांनी सांगून टाकले आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी लॉबिंग करणारे मिंधे गटातील हवशे-नवशे गॅसवर गेले आहेत.
ठाण्याच्या जागेवरून मिंधे गट आणि भाजपचे घोडे अडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परस्पर कल्याणच्या जागेवरून श्रीकांत शिंदे यांची घोषणा करून ठाण्यावर एकप्रकारे दावा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर लगोलग भाजप नेते संजीव नाईक यांनी उमेदवारी जाहीर झाली नसतानादेखील प्रचाराचा ‘नारळ’ फोडला आहे. नाईक यांनी भाईंदरच्या बालाजीनगरमधील एका सभागृहात स्थानिकांबरोबर बैठक घेतली. त्यात भाजपचे काही माजी नगरसेवक व कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, पक्षाने उमेदवारीच्या अनुषंगाने हिरवा कंदील दिला असून त्याची सुरुवात आपण येथून करत आहोत. ९९ टक्के आपली उमेदवारी पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय देतील निश्चित आहे. त्या दृष्टीने आपण काम करू असे सांगितले. त्यामुळे कल्याणच्या जागेची घोषणा करून ठाण्यावर दावा करण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याने मिंध्यांची चांगलीच गोची झाली आहे.
मिंध्यांच्या गोटात चलबिचल
मिंधे गटाकडून माजी आमदार रवींद्र फाटक व नरेश म्हस्के हे इच्छुक आहेत. मात्र ते आपटण्याची शक्यता अधिक असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनीच उमेदवारी लढवावी असा आग्रह केला जात आहे. यावर जोरबैठका सुरू असतानाच भाजपने थेट संजीव नाईक यांनाच प्रचाराला लावल्याने मिंध्यांच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे.
भाजपवाल्यांना आचारसंहिता नाही काय?
आचारसंहितेच्या काळात पक्षाचे नाव, नेत्यांची छायाचित्रे झाकण्यात येतात, अन्यथा तो आचारसंहितेचा भंग ठरतो. ठाण्यातील वर्तकनगर येथे रेमंडजवळ भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या कार्यालयावर भाजपचे पक्षचिन्ह, पक्षाचे नाव आणि मोदी-फडणवीसांचे फोटो उघडपणे झळकत आहेत. भाजपवाल्यांना आचारसंहिता नाही काय? की निवडणूक अधिकारी त्यांच्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहेत, असा सवाल ठाणेकरांमधून केला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List