मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचंय, संजय राऊत यांचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ज्या पद्धतीने खाली आणली आहे, ती देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे. राजकारणामध्ये लोकं खोटं बोलतात, पण पंतप्रधानपदावरील व्यक्तीने मर्यादा पाळल्या पाहिजे. मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे. त्यांनी इतके खोटे बोलू नये या मताचे आम्ही आहोत, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी यांना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचे असल्याचा घणाघाती आरोपही राऊत यांनी केला. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांना सुद्धा महत्त्व आहे, हे मोदी मानायला तयार नाहीत. हाच संविधानाचा धोका असून मोदींना लोकसभा, विधानसभा विरोधकांशिवाय हव्या आहेत. मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचे आहे. विरोधक खतम करा, त्यांना तुरुंगामध्य़े टाका ही मोदींची विचारसरणी संविधानासा सर्वात मोठा धोका आहे. खोटे बोलायचे, विरोधकांना बदनाम करायचे, त्यांच्यावर खोटे आरोप करायचे, तुरुंगात टाकायचे, धमक्या द्यायच्या आणि सगळे भ्रष्टाचारी लोकं आपल्या पक्षात घ्यायचे, हाच संविधानाला मोठा धोका आहे, असेही राऊत म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसने 80 वेळा संविधान तोडल्याचा आरोप केला. यालाही राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, याला संविधान तोडणे म्हणत नाही. देशाच्या गरजेनुसार बदल करणे म्हणतात. या बदलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मान्यता दिलेली आहे. त्यामुळे काँग्रेसवर संविधानात बदल केल्याचा आरोप हा चुकीचा असल्याचे राऊत म्हणाले.
सांगली मतदारसंघाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या भावना आम्ही समजून घेतो. ते काँग्रेसचे जुने कार्यकर्ते असून सांगलीत अनेक वर्ष पक्षाचे काम करत आहेत. तरीही येथे गेल्या काही वर्षापासून जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली असून सांगलीमध्ये, मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतोय. गेल्या 10 वर्षापासून सांगलीत भाजपचे खासदार निवडून येत असून त्यांच्याशी टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणे गरजेचे आहे ही जनभावना आहे. या शक्तीशी मुकाबला करायचा असेल तर शिवसेना हवी म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या पाठी शिवसेना उभी आहे. राष्ट्रवादीने तिथे पाठींबा दिला असून काँग्रेसनेही ती जागा शिवसेनेला सोडली आहे.
ते पुढे म्हणाले की, आम्ही सगळ्या जागा एकत्र लढत आहोत. आम्हाला एकत्र काम करायचे असून प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. 48 उमेदवार महाविकास आघाडीचे असून त्यांच्यासाठी आम्ही एकत्र काम करू. तसेच उत्तर मुंबईची जागा परंपरेने शिवसेनेची आहे. तिथे शिवसेना लढली तर 100 टक्के निवडून येईल. पण काँग्रेसने ती जागा मागितली आणि आम्ही कोणतीही खळखळ न करता ती दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List