पंतप्रधानांचा सन्मान ठेवा, त्यांच्यासमोर अशी वक्तव्ये अशोभनीय; सुप्रिया सुळे यांनी मुनगंटीवारांना सुनावले
भाजपचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामोर प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना चांगलेच फटकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर असताना असे गलिच्छ वक्तव्य करणे योग्य नाही. मोदी याचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा अशोभनीय वक्तव्यांबाबत मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला.
नरेंद्र मोदी एका पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना एक विनंती आहे, की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण केले आहे. त्याविरोधात पंतप्रधान मोदी यांनी कारवाई करावी. राजकारण सुरच राहील ,मात्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. मुनगंटीवार यांनी भाषणात केलेल्या अशोभनीय वक्तव्यांचा आपण निषेध करत आहोत. माझी अपेक्षा आहे मोदी याचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे, सभेत अशा प्रकारची भाषा वापरणे थांबले पाहिजे. त्यासाठी अशा व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी मोदींना केली आहे.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याचे आपण डिसेंबरपासून सांगत आहोत. राज्यातील शेतकरी, मजूर अडचणीत आहे याकडे सातत्याने लक्ष वेधत आहोत. माझ्या मतदारसंघात उजनीत एक थेंब पाणी नाही, नाझरेमध्ये एक थेंब पाणी नाही. संपूर्ण महाराष्ट्रात 35% पाणी शिल्लक आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल की नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. असे असतानाही हे ट्रिपल इंजिन खोके सरकार असंवेदनशीलता दाखवत प्रचारात व्यस्त आहे. त्यांना दुष्काळाचं काही घेणेदेणे नाही, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List