Lok Sabha Election 2024 : अजितदादा म्हणाले तोंड उघडायला लावू नका
माझ्या निवडणुकीत कधी भावंड फिरली नाहीत. आता नुसती गरागरा फिरत आहेत. अरे, भाऊ उभा असताना कधी फिरला नाहीत. आता कसे काय फिरताय? त्यांचे हे फिरणे म्हणजे पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत. एकदा मतदान झाले की या छत्र्या परदेशात हवाई सफर करायला जातील. सगळ्यांनी तीच सवय आहे. मी आदराने तोलून मापून बोलतोय, तोंड उघडायला भाग पाडले तर फिरता येणे मुश्किल होईल. गप बसलोय म्हणून वळवळ करता का? या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबातील इतर सदस्यांवर निशाणा साधला.
ते बारामतीत राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. शरद पवार यांनी सोमवारी दमबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावरही अजित पवार बोलले. मी दमबाजी केली तर लोक मला बांबू लावतील.
बारामतीतील काही लोक केव्हीके, ट्रस्टमध्ये कामाला आहेत. त्यांना आता दमबाजी केली जात आहे. या पद्धतीने बारामतीत कधी मते मागितली गेली नव्हती. पातळी सोडून हे सगळे चालले असल्याचे अजित पवार म्हणाले.
शिवतारेंना कोणी फोन केले?
विजय शिवतारे आमच्यासोबत आले आहेत. त्यांनी अर्ज दाखल करावा म्हणून कोणी मध्यरात्रीपर्यंत त्यांना फोन केले हे शिवतारेंनी मला दाखवले. हे त्यांना माघार घेऊ नका, अर्ज दाखल करा, असे सांगत होते. हे कोणत्या पातळीवरचे राजकारण चाललेय? मी संबंधितांचे फोन बघितल्यावर मला वाईट वाटले. ज्यांच्यासाठी मी जिवाचे रान केले त्यांच्याकडून इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात असेल असे वाटले नव्हते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List