अहमदपूरमध्ये दुकानांना भीषण आग; 11 दुकाने जळाल्याने 2.5 ते 3 कोटीचे नुकसान
अहमदपूर – नांदेड हायवेवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गुणाले कॉम्प्लेक्सला रविवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे कॉम्प्लेक्स मधील मशनरी स्टोअर्स, इस्त्री दुकान, मेडिकल स्टोअर्स, डेंटल क्लिनिक, स्विट मार्ट, किराणा दुकान, तीन लेडीज एम्पोरिअमसह अशी जवळपास 11 दुकाने जळून खाक झाली. यात अंदाजे 2.5 ते 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची अहमदपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुमारे पंधरा फुट उंचीवर आगीच्या ज्वाळा भडकत होत्या. आगीचे रौद्ररूप लक्षात घेऊन नागरिकांनी दुकानातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण अचानक लागलेल्या आगीने दुकानांचा अक्षरशः कोळसा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत ज्ञानेश्वर गंगाधर पस्तापुरे यांचे (मेडिकल) 10 लाख रुपये, शिलानंद किशोर पाटील (शेती अवजारे) 30 लाख रुपये, गोविंद तुळशीराम तेलंगे (कपड्याची इस्त्री), 3.50 लाख रुपये, डॉ. सुनिल गुणवंत कच्छवे (समर्थ टेंडल क्लिनिक) 25 लाख रुपये, इमरोज सलीम पटवेगर (ममता ब्युटी कलेक्शन) 35 लाख रुपये, अफरोज सलीम पटवेकर (मेमसाब ब्युटी कलेक्शन) 30 लाख रुपये, अमोल गोविंद वंगलवार (माऊली लेडिज एम्पोरिअम) 25 लाख रुपये, यतिन रमेश जागाणी (मारोती स्विट मार्ट) 19 लाख रुपये, सतीष हरीभाऊ भदाडे (भदाडे लेडिज एम्पोरिअम) 26 लाख रुपये, साईनाथ भिमराव अंकुलवार (झेरॉक्स सेंटर अॅण्ड जनरल) 17 लाख रुपये, भिमराव नरहरी अंकुलवार (लक्ष्मी नारायण किराणा) 20 लाख रुपयांचा दुकानातील माल पूर्णपणे जळून खाक झाला. या सर्वांचे मिळून अंदाजे 2.5 ते 3 कोटी नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन नगरपालिका अग्नीशमन दल अहमदपूर, उदगीर, चाकुर, लोहा या ठिकाणाहून अग्निशमन वाहनांना पाचारण केले. तब्बल चार तास थांबू न आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन, तसेच व्यापार्यांना सहकार्य केले. यात बालाजी रेड्डी यांचा हात व मानेखाली काही भागावर आगीमुळे भाजून जखमा झाल्या आहेत. अग्निशमन विभागाच्या ड्रायव्हर कम ऑपरेटर अजित अंगद लाळे, प्रभारी ऑफीसर कैलास रोहिदास सोनकांबळे, प्रशांत गायकवाड, प्रकाश जाधव आदी कर्मचार्यांनी जीव धोक्यात घालून मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणली. तरी आतील साहित्य मात्र जळून खाक झाले. दुकानांमधील पैसे देखील जळून खाक झाले. सुमारे तीन तासाहून अधिक काळ आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीची घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, तसेच महावितरणच्या कर्मचार्यांनीदेखील घटनास्थळी धाव घेत खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज खंडित केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List