संपदा नागरी सहकारी पतसंस्थेत 13 कोटींचा घोटाळा; ज्ञानदेव वाफारेसह 22 आरोपी दोषी
राज्यात गाजलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पतसंस्थेच्या 13 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपी ज्ञानदेव सबाजी वाफारे सह 22 आरोपींना जिल्हा व सत्र एन.आर. नाईकवाडे यांनी अपहार प्रकरणी दोषी धरले आहे. आरोपीमध्ये ज्ञानदेव सबाजी वाफारे, सुजाता ज्ञानदेव वाफारे, सुधाकर परशुराम थोरात, भाउसाहेब कुशाबा झावरे, उत्तमराव दगडू चेमटे, दिनकर बाबाजी दुबे, विष्णूपंत गणपत व्यवहारे, राजे हसन अमीर, आरोपी क.9 नामे बबन देवराम झावरे, लहू सयाजी पंगाळे, हरिश्चंद्र सावळेराम लोदे, रविंद्र विश्वनाथ शिंदे, साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर, संजय चंपालाल बोरा, अनुष प्रविण पारेख, मारूती खंडू रोहोकले, निमाजी खंडू रोहोकले, बबन खंडू रोहोकले, सुधाकर गोपीनाथ मुंबे, गोपीनाथ शंकर सुंबे, महेश बबन झावरे व संगिता हरिश्चंद्र लोंढे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे हे काम पाहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्र खटल्यामधील लेखा परिक्षक देवराम मारूतराव बारसकर यांनी वरील आरोपींविरूध्द 01 ऑगस्ट २०११ रोजी कोतवाली पोलिस स्टेशन नगर येथे फिर्याद दिली होती. फिर्यादीमध्ये विनातारण कर्ज कर्जदारांना वाटप करण्यात आलेले होते. वरील आरोपींनी सदर रक्कमेचा अपहार करून सदर रक्कम स्वतःचे फायद्याकरिता वापरली होती. तसेच रकमेबाबत खोटया नोंदी करून सभासदास चुकीची माहिती देवून कायदेशिररित्या आर्थिक संस्था चालविताना ठेवीदाराच्या ठेवीचा विनीयोग बेकायदेशिरपणे अटी व नियम यांचे पालन न करता सभासदांच्या ठेवी परत करण्यास असमर्थता दर्शविली व ठेवीदारांचे रकमेची अफरातफर करून फसवणूक एकुण रक्कम रु.13,38,55,667/- केली म्हणून फिर्यादी यांनी आरोपी विरूध्द भा.द.वि. कलम 177, 409, 417, 420, 465, 467, 468, 471, 120(ब) व महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंरक्षण कायदा 1999 चे कलम 3 प्रमाणे फिर्याद दिलेली होती. येथील न्यायालयामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे यांनी बाजू मांडताना या पतसंस्थेमध्ये कशा पद्धतीने बोगस कर्ज प्रकरण करण्यात आलेले होते. तसेच हा प्रकार होताना या संचालक मंडळाचा यामध्ये कशा पद्धतीने समावेश होता यासह विविध प्रकारचे पुरावे त्यांनी न्यायालयामध्ये सादर केले.
दरम्यान ,नगर येथील संपदा पतसंस्थेचा घोटाळा हा राज्यभर गाजलेला होता या घोटाळ्यामध्ये ज्ञानदेव वाफारे हे यातील मुख्य आरोपी म्हणून होते. पतसंस्थेमध्ये सर्वसामान्य लोकांच्या ठेवी या ठेवण्यात आलेल्या होत्या. जे हातावर पोट भरतात असे अनेक खातेदार या पतसंस्थेची निगडित होते. बोगस पद्धतीने कर्ज वाटप करून रक्कम स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली. वाफारे हे पारनेर तालुक्यातील असल्यामुळे त्यांनी या पतसंस्थेचे जाळे नगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरवले. सर्वसामान्य लोकांचे पैसे हडप झाल्यानंतर त्याचा उद्रेक मोठ्या प्रमाणामध्ये झाला येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये अनेकांनी मोर्चा नेला. साधारणता 58 मोर्चे या जिल्ह्यामध्ये झाले होते. दिवंगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अनिल राठोड यांनी येथील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यावेळेला आंदोलने केली होती. तसेच प्रशासनाच्या समवेत विशेष बैठक सुद्धा त्यांनी आयोजित केलेली होती. तेव्हापासून ते आंदोलन आज पर्यंत सुरू होते. गोरगरीब जनतेचे पैसे अडकल्यामुळे जर पैसे मिळाले नाही तर आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका सुद्धा काही सभासदांनी घेतली होती व त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली होती. या पतसंस्थेमध्ये बोगस होणे कारण सुद्धा झाल्याचे निष्पन्न झालेले होते व त्याचा स्वतंत्र गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. एकंदरीतच बोगस कर्ज प्रकरण या पतसंस्थेमध्ये झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे पैसे हे मिळू शकले नाही त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये पुढे काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List