Lok Sabha Election 2024 रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ भाजपाने हिसकावताच किरण सामंत यांची माघारीची पोस्ट, उदय सामंतांची सारवासारव
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपने हिसकावल्यानंतर मिंधे गटाचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत आपण निवडणूकीत माघार घेतल्याचे जाहीर केले होते. काही काळानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. या पोस्टमुळे शिंदेगट भाजपसमोर हतबल झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही पोस्ट भावनिक होती अशी सारवासारव केली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या जागेवरुन महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. भाजपने या मतदार संघावर दावा दाखल केला असून भाजपकडून उमेदवारीसाठी नारायण राणेंचे नाव पुढे येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून किरण सामंत यांनी दोन महिन्यांपुर्वीपासूनच तयारी सुरू केली होती. किरण सामंत यांच्या वाढदिवसाला भावी खासदार म्हणून जोरदार बॅनरबाजी केली होती. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपने प्रबळ दावा केल्यामुळे शिंदेगट हतबल झाला आहे. हा मतदार संघ जवळजवळ भाजपने हिसकावला आहे. काल मंगळवारी रात्री किरण सामंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. या पोस्टमधून त्यांनी आपण निवडणूकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि अबकी बार चारशे पार करण्यासाठी आपण लोकसभा निवडणूकीतून माघार घेत आहोत असे पोस्टमध्ये म्हटले होते. मात्र काही काळानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्या प्रकरणावर सारवासारव करत किरण सामंत भावनिक आणि संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांनी ही पोस्ट टाकल्याचे सांगितले.
नारायण राणे-उदय सामंत भेट नक्की कशासाठी?
किरण सामंत यांच्या पोस्टनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत संवेदनशील आणि भावनाप्रधान व्यक्ती मतदार संघाचा विकास करु शकते. जो काफर असतो, कठोर असतो तो विकास करु शकत नाही. ते असे कोणाबददल म्हणाले याबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच आज दुपारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. ही भेट नक्की कशासाठी याबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List