देश हुकुमशाहीने चालवण्याचा भाजपचा निर्धार, जनतेचा महाभयंकर उद्रेक होईल! – विजय वडेट्टीवार
देशात सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी लोकशाही जिवंत ठेवायची नाही, रशियातील पुतिन प्रमाणे विरोधकांना संपवून टाकायचे काम आहे. हा देश हुकुमशाहीने चालवण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहे. पण जनतेचा इतका महाभयंकर उद्रेक होईल की सत्ताधाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले जाईल, असा हल्लाबोल काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
सत्तेचा मुकूट कायमच आमच्या डोक्यावर राहील अशा अदिर्भावामध्ये देशाचा कारभार हाकला जातोय. त्याही पलिकडे जाऊन देशात विरोधकच शिल्लक ठेवायचा नाही. देश पूर्णत: हुकुमशाही पद्धतीने चालवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. देशात लोकशाही, संविधान आणि घटनेने दिलेले स्वातंत्र्य शिल्लक राहणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. जनतेच्या दरबारामध्ये आम्ही जाऊन आणि जनताच योग्य तो निर्णय घेईल. पण सरकारच्या अध:पतनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
…तर दाऊदही चालेल
अभिनेता गोविंदा याने नुकताच मिंधे गटामध्ये प्रवेश केला. याच गोविंदाने निवडणुकीमध्ये दाऊदची मदत घेतली होती, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केला आहे. यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. सत्तेत किंवा सत्तेच्या बाजूने गेला तर दाऊद आणि दाऊदचे हस्तकही सत्ताधाऱ्यांना चालतील. गोविदाने दाऊदच्या मदतीने निवडणूक जिंकल्याचा आरोप भाजपच्या माजी आमदाराने केला होता. अशा अभिनेत्याला आणून फक्त त्याला बघायला लोकं गोळा करता येतील, पण त्याच्या नाचगाण्याचा काही परिणाम होणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List