मुलुंडमधील कबूतरखान्यामुळे फ्लेमिंगोंना धोका, उच्च न्यायालयात याचिका
मुंबईतील कबूतरखाना बंद केल्यानंतर पालिकेने उपनगरात चार ठिकाणी तात्पुरते कबूतरखाने उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुलुंड येथे उभारण्यात येणाऱया कबूतरखान्यामुळे फ्लेमिंगोंना धोका पोहोचणार असून त्यांच्या अधिवासावर परिणाम होणार असल्याचा दावा करत स्थानिक रहिवाशांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या ठिकाणी कबूतरखाना उभारू नये अशी मागणी करण्यात आली असून याचिकेवर लवकरच सुनावणीची शक्यता आहे.
मानवी आरोग्यासाठी कबूतरांची विष्ठा आणि पिसे धोकादायक असून यामुळे श्वसनविकार तसेच बुरशीजन्य संसर्गांचा धोका निर्माण होत आहे. कोर्टाच्या आदेशामुळे मुंबईतील सर्व कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून जैन समाजाच्या रेटय़ामुळे हे कबूतरखाने मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरात उभारण्याचे पालिकेने ठरवले आहे. वरळी, अंधेरी, गोराई आणि मुलुंड या ठिकाणी हे कबूतरखाने तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याबाबत परवानगी देण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला असला तरी मुलुंड-ऐरोली मार्ग येथील कांदळवनांच्या जवळ हा कबूतरखाना उभारण्यात येणार असल्याने स्थानिक रहिवाशांनी याला आक्षेप घेतला आहे. अॅड. सागर देवरे यांनी याप्रकरणी हायकोर्टात मध्यस्थी याचिका दाखल केली असून मुलुंडमधील कबूतरखान्याला विरोध केला आहे.
याचिकेत काय म्हटले आहे
- तज्ञ समितीचा अहवाल प्रलंबित असताना, दबावानंतर पालिकेचा कबूतरखाना उभारण्याचा निर्णय.
- ऐरोली-मुलुंड चेकनाका येथील विशिष्ट ठिकाण कबूतरखान्यासाठी अत्यंत अयोग्य आहे तसेच सार्वजनिक सुरक्षा व आरोग्यासाठी धोकादायक आहे.
- हे ठिकाण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱया मुख्य रस्त्यावर असून कबुतरांमुळे अपघाताचा धोका आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List