वांद्रे-वरळी सी लिंकवरील प्रवास महागला; नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांच्या खिशाला भुर्दंड
एकीकडे मुंबईतील सुशोभीकरणाच्या कामांवर तसेच स्ट्रीट फर्निचरला कोटय़वधी खर्च होत असताना दुसरीकडे आता नवीन वर्षात मुंबईकरांचा खिसा कापण्याचे काम मिंधे सरकार करणार आहे. कारण मुंबई उपनगरातून दक्षिण मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱयांना जादा टोल द्यावा लागणार आहे. वांद्रे-वरळी सी लिंकने प्रवास करणाऱयांना नवीन आर्थिक वर्षात अधिकचा खिसा रिकामा करावा लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात ‘एमएसआरडीसी’ने वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलच्या दलात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून हे नवीन दर पुढील तीन वर्षांसाठी कायम राहणार आहेत.
पुणे-नाशिक-सातारकरांना अडीच टक्के जादा टोल
– मिंधे सरकार पुणे-नाशिक आणि सातारकरांचा खिसाही नवीन आर्थिक वर्षात कापणार आहे. कारण या मार्गावरून प्रवास करणाऱयांनाही अडीच टक्के अधिकचा टोल भरावा लागणार आहे. खेड-शिवापूर आणि आनेवाडी या टोल नाक्यांवर मोटार, जीप आणि हलक्या वाहनांना उद्यापासून 120 रुपये टोल भरावा लागणार आहे. सध्या हाच दर 115 रुपये इतका आहे. यात पाच रुपयांची वाढ होणार आहे.
– खेड-शिवापूर टोल नाक्यावर बस आणि ट्रकसाठी 400 रुपये इतका टोल द्यावा लागेल. सध्या हा दर 390 रुपये इतका आहे, तर अवजड वाहनांसाठी खेड-शिवापूर टोल नाक्यावर 1 एप्रिलपासून 630 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे. सध्या हा दर 615 रुपये इतका आहे.
– हलक्या व्यावसायिक वाहनांना 185 ऐवजी 190 रुपये टोल द्यावा लागणार आहे.
असे असतील नवीन दर
कार, जीप, टॅक्सीला एकेरी प्रवासासाठी 100 रुपये एवढा टोल भरावा लागणार आहे. सध्या हा दर 85 रुपये इतका आहे, तर मिनी बस आणि त्या प्रकारातील वाहनांना 160 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे. सध्या हा टोल 130 रुपये इतका आहे. याशिवाय ट्रक, बस अशा मोठय़ा वाहनांना आता 210 रुपये इतका टोल भरावा लागणार आहे. सध्या हा दर 170 रुपये इतका आहे. टोलचे हे नवीन दर 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार आहेत. आगाऊ पन्नास कुपन खरेदी करणाऱयांना एकूण टोलच्या रकमेवर दहा टक्के तर आगाऊ 100 कुपन खरेदी करणाऱयांना एकूण टोलच्या रकमेवर 20 टक्के इतकी सवलत दिली जाणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List