Latur Rain News – देवणी तालुक्यात पावसाचा कहर; वलांडी मंडळात अतिवृष्टी, देवनदी काठचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पाण्याखाली

Latur Rain News – देवणी तालुक्यात पावसाचा कहर; वलांडी मंडळात अतिवृष्टी, देवनदी काठचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पाण्याखाली

सलग तिसऱ्यांदा मांजरा नदीच्या पूराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. वरुन आभाळ फाटले अन् नदीचे पाणी शेतशिवारासह गावागावात शिरल्याने “पाणीच पाणी चोहीकडे, शेतशिवार गेला कोणीकडे?”, असे विदारक चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. सतत पडणारा पाऊस, नदीला आलेला पूर व शेतशिवारात तुंबलेले पाणी पहाताना शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला आहे.

मुसळधार पावसाने कहरच केला असून अख्खा शिवार पाण्यात बुडाला आहे. काय शोधावे, कुठे शोधावे या विदारक परिस्थितीने शेतकऱ्यांच्या मनात काहूर माजवले आहे. नदीकाठच्या गावात नासाडी झालेल्या पिकांची दुर्गंधी, जनावरांचा चारा वाहून नासून जातोय, दारात भिजत असलेली जनावरे टाहो फोडतानाचा आवाज, काळजात चर्रर्र करत आहे. दसरा दिवाळी सण तोंडावर असताना हे सण उत्सव साजरे करण्याचे पाहिलेले स्वप्न पाण्यात वाहिले आहे. तालुक्यात गेल्या पाच दशकात असा पाऊस व परिस्थिती कधीच पाहिली नाही, असे सांगताना वयोवृद्धांचा कंठ दाटून आला. सततच्या मुसळधार पावसामुळे शनिवारी (27 सप्टेंबर 2025) देवनदीला पूर आला असून या पुरामध्ये नदीकाठचे विठ्ठल रुक्मिणी व महादेव मंदिर आणि पुंडलिकाचे मंदिर पूर्णतः पाण्यात बुडाले आहे. तसेच नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी घुसले आहे.

देवणी तालुक्यात शुक्रवारी (२६ सप्टेंबर २०२५) रात्रभर पावसाच्या मुक्कामानंतर शनिवारी सकाळी अर्ध्या तासापासून मोठ्या पावसाला सुरुवात झाली होती. शासनाच्या दप्तरी वलांडी मंडळांत सर्वाधिक ९१ मि.मी पावसाची नोंद झाली तर, देवणी मंडळात ५९ तर बोरोळ मंडळात ५३ मि.मी पावसाची नोंद झाली. तसेच तालुक्यातील सरासरी ६७.६६ मि.मी पावसाची नोंद झाल्याने ढगफुटी झाली आहे. वलांडी मंडळात पावसाचा हाहाकार माजला आहे. पावसामुळे तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. खरीप हंगाम विशेषत: तालुक्याची अर्थ वाहिनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. जवळपास २६ हजार हेक्टर वरील उभे पीक पूर्णता जलमय झाले आहे. तसेच तुर पीक पण नष्ट होत आहे. यामुळे शेतकऱ्याचे जवळपास कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणारे आहे.

तालुक्यातील उदगीर निलंगा राज्यमार्गावरील धनेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. हेळंब-गिरकचाळ-लातूर, जवळगा-साकोळ, शिवाजीनगर ते बोरोळ, बोरोळ-सिधिंकामट हे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सोमनाथ वाडकर व पोलीस निरीक्षक भिमराव गायकवाड यांनी नागरिकांना सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;