पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या आणि पीएम केअर फंडातून कर्जमाफी करा! – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावरच नाही तर बांधाच्या पलीकडेही गेले. या दौऱ्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या आणि पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा अशी मागणी केली. याचाच पुनरुच्चार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला.
संजय राऊत म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदील आहेत. निवारा नसल्याने शेतकरी निर्वासितासारखे राहत आहेत. सरकारी मदत अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. पंचनाम्याला अधिकारीही पोहोचलेले नाहीत. घराघरात पाणी आहे. नद्यांचा प्रवाह वळल्याने शेतजमीन राहिलेली नाही. त्यामुळे भविष्यात माझी शेती कुठली आणि तुझा बांध कुठले हे सुद्धा कळणार नाही. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना कृतज्ञतापूर्वक सांगितले की, आपण केलेल्या कर्जमाफीच्या आधारावर इथपर्यंत आलो आहोत. आता कर्जमाफी केली नाही तर जगणे कठीण होईल.
हेक्टरी 50 हजार रुपये मदत आणि पीएम केअर फंडातून कर्जमुक्ती या दोन मागण्या उद्धव ठाकरे यांनी प्रामुख्याने केल्या आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी लावलेले निकष अत्यंत चुकीचे आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना एकरी 3-4 हजार रुपयांच्या वर मदत मिळणार नाही. त्यामुळे हेक्टरी 50 हजार मदत मिळणे गरचेचे आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंजाबचे उदाहरण दिले. पंजाबमध्येही पूरस्थिती गंभीर असून केंद्राने मदत केलेली नाही. मात्र मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत जाहीर केली. तसेच ज्यांची घरे वाहून गेली त्यांना सरकार 45 दिवसात घर बांधून देणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा 50 हजार हेक्टरी मदत मिळावी आणि तात्काळ कर्जमाफी व्हावी, असे राऊत यावेळी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List