संस्कृतायन- उपमा कालिदासस्य कुमारसंभव

संस्कृतायन- उपमा कालिदासस्य कुमारसंभव

 डॉ. समिरा गुजर जोशी

संस्कृत साहित्यातील अभिजात कलाकृती हा भारतीय साहित्याचा वैभवशाली ठेवा. भाषा, शब्द, संस्कृती यांनी समृद्ध असा हा ठेवा जितका अनुभवावा तितकी त्याची आसक्ती वाढत जाते. अनुपमेय अशा या साहित्याचे रसग्रहण करीत त्याचा परिचय करून देणारी ही लेखमालिका.

संस्कृत साहित्यातील अभिजात कलाकृती हा भारतीय साहित्याचा वैभवशाली ठेवा आहे. या साहित्यकृती भारतीय संस्कृतीच्या मंथनातून तयार झाल्या आहेत. संस्कृत साहित्य असे म्हटले की, अपरिहार्यपणे आपल्याला आठवण होते ती कालिदासाची.

आज कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या नाटकातूनच अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘शाकुंतल’ नाटकाचा जन्म झाला. मेघदूताचा अनुवाद कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, शांताबाई शेळके अशा अनेक दिग्गज कवींना करावासा वाटला. भास या नाटककाराने मांडलेला कर्ण असो वा दुर्योधन किंवा कैकयी तरुण नाटककारांनाही भुरळ घालते. ‘प्रिया बावरी’ किंवा ‘धाडीला राम तिने का वनी?’ यासारखी नाटके ही भासाच्या कलाकृतींचा मराठी अनुवाद आहेत. ‘मृच्छकटिक’ असू दे ‘वेणीसंहार’ वा ‘मुद्राराक्षस’ या सर्व संस्कृत नाटकांचे मराठी अनुवादही झाले आणि त्यांचा प्रभाव अजूनही टिकून आहे. त्यामुळे संस्कृत साहित्याचा आस्वाद आपण वेळोवेळी घेत आलो आहोतच. संस्कृत महाकाव्यांच्या परंपरेने मराठीतील पंत किंवा पंडिती काव्य परंपरेचे पोषण केले. तर अशाच काही अभिजात संस्कृत साहित्यकृतींचा परिचय आपण करून घेणार आहोत.

सुरुवात करूया कालिदासाच्या ‘कुमारसंभवा’पासून. अर्थात संस्कृत महाकाव्ये काय किंवा नाटके काय, ही विस्तृत असतात. त्यामुळे संपूर्ण काव्याचा परिचय करून घेणे अवघड होईल. म्हणून आपण प्रत्येक साहित्यकृतीची ढोबळ ओळख करून घेऊया. आणि त्यातील काही महत्त्वाचे प्रसंग म्हणा, वर्णनं म्हणा किंवा पात्र चित्रण. त्याचा परिचय करून घेऊ.

कुमारसंभवाचे कथानक आपल्या परिचयाचे आहे. शीर्षकातच म्हटल्याप्रमाणे कुमाराचा जन्म होणे – कुमारसंभव – हा ह्या महाकाव्याचा विषय आहे. कुमार म्हणजे ‘कुमार कार्तिकेय.’ भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पोटी कुमार कार्तिकेयाचा जन्म होईल आणि तो तारकासुराचा वध करून देवांवरील संकट दूर करेल अशी देवांची योजना आहे. अर्थात या योजनेची कल्पना भगवान शिवांना नाही, कारण ते सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतला नष्ट केल्यापासून ध्यानस्थ बसले आहेत. या त्यांच्या समाधि अवस्थेत व्यत्यय आणण्याचे सामर्थ्य कोणामध्येही नाही. पार्वतीला तर या कशाचीच कल्पना नाही. ती तर हिमालयाची लाडकी कन्या आहे. आता या दोघांची भेट कशी होणार, त्यांचा विवाह कसा होणार, भगवान शिव हिमालय कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार करतील का? हा या महाकाव्याचा विषय आहे.

आज आपण या महाकाव्याची सुरुवात कविकुलगुरू कालिदासाने ज्या भव्यतेने केली आहे ते पाहू. एखादा चित्रपट सुरू होताना ज्याप्रमाणे आजकाल आधी एखादा ‘ड्रोन शॉट’ (विहंगम दृश्य) असतो, आधी ही कथा कोणत्या परिसरात घडते आहे ते दाखवले जाते. तसेच कालिदासही आधी ही कथा घडते ते स्थळ आपल्या शब्दकुंचल्याने साकार करतात.

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा

हिमालयो नाम नगाधिराज।

पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य

स्थित पृथिव्या इव मानदण्ड?

आता या एकाच श्लोकात कालिदासाला महाकवी का म्हणतात ते लक्षात यावे. हिमालयाची अवघी महानता त्याने एका श्लोकात पकडली आहे. तो म्हणतो, उत्तर दिशेला हिमालय नावाचा एक पर्वतांचा राजा आहे. खरे तर विधान इतकेच आहे. पण तो हिमालय कसा आहे? देवतात्मा आहे. अर्थात दैवी आहे. देवांचे निवासस्थान आहे. आता बघा कालिदास जणू अंतरिक्षातून भारताच्या नकाशाकडे पाहतात आणि वर्णन करतात – पूर्व आणि पश्चिम समुद्रामध्ये उभा हा जणू पृथ्वीचा मानदंड आहे. हिमालय हा जणू पृथ्वीचा ‘राजदंड‘ आहे. तो सन्मानाचे भव्य आणि स्थिर असे चित्र आहे. हिमालय हा पृथ्वीचा मानदंड आहे ही उपमा इतकी सुंदर आहे की ‘उपमा कालिदासस्य’ या उक्तीचा प्रत्यय या पहिल्याच श्लोकात यावा. अर्थात ही तर केवळ सुरुवात आहे. ‘साद देती हिमशिखरे’ तसे हे केवळ हिमालयाचे केवळ दुरून दर्शन झाले आहे. त्या पर्वतराजीच्या कुशीत कोणते नाटय़ आकाराला येत आहे हे आपण पाहूया पुढील लेखात.

(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;