राज्यात पराभव निश्चित, मग 45 जागा कशा मिळवणार? जयंत पाटील यांचा भाजपला टोला
लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. भाजपने अब की बार 400 पार ची घोषणा केली आहे. तसेच राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी या 45 प्लसच्या घोषणेची हवा काढत भाजपला चांगलाच टोला लगावला आहे.
भाजपने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे. भाजपच्या या दाव्याची खिल्ली उडवत जयंत पाटील म्हणाले की, महायुतीचा कोल्हापूर आणि सातारा येथे पराभव निश्चित आहे. अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार पडणार आहे. सरकारवर जनतेचा रोष आहे. महाराष्ट्रात भाजपविरोधात हवा आहे. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित असताना ते 45 प्लस घोषणा कशी करतात, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. भाजपने धनगर समाजाची सातत्याने फसवणूक केली आहे. धनगर आरक्षणाबाबतही सरकारने फसवणूक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हा समाज त्यांच्यावर नाराज असून लोकसभा निवडणूकीत ते दिसेल, असेही पाटील म्हणाले.
‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत यावेत, असा आमचा प्रयत्न होता. मात्र, त्यांचा वेगळा विचार असल्यास हातकणंगलेमध्ये उमेदवार द्यावा लागेल, असेही पाटील म्हणाले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच येण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. याबाबत दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List