भावा, मी तुला या वर्षी राखी बांधू शकणार नाही रे..! चिठ्ठी लिहित विवाहितेनं जीवन संपवलं, 6 महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. 9 ऑगस्टला देशभरात हा सण उत्साहाने साजरा केला जाईल. मात्र या सणापूर्वी आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावा, मी तुला या वर्षी राखी बांधू शकणार नाही रे..! अशी भावूक चिठ्ठी लिहून येथे एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. श्रीदिव्या (वय – 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून अवघ्या 6 महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. मात्र सासरच्या छळाला कंटाळून तिने जीवन संपवले.
श्रीदिव्या ही महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून काम करत होती. सहा महिन्यांपूर्वी तिचे रामबाबू नावाच्या तरुणासोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच पती आणि सासरच्या मंडळींनी दिव्याचा छळ करण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून दिव्याने आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने भावाच्या नावाने एक चिठ्ठीही लिहून ठेवली.
श्रीदिव्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले की, रामबाबू रोज दारू पिऊन घरी यायचा आणि माझा शारीरिक छळ करायचा. मला शिवीगाळ करायचा. मला युजलेस म्हणायचा. कुठल्याही महिलेसमोर माझा अपमान करायचा. डोक्यावर, गालावर चापट मारायचा आणि त्यानंतर डोकं गादीवर दाबून पाठीत बुक्के मारायचा. त्यामुळे माझे अंग रोज दुखायचे. मला हुंडा घेऊन ये सांगायचा. या सगळ्याला कंटाळून मी जीवन संपवत आहे. तुला यावर्षी मी राखू बांधू शकणार नाही. तू तुझी काळजी घे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
श्रीदिव्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिच्या मृत्युला पती आणि सासरचे लोक जबाबदार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच माझ्या मृत्यूनंतर त्यांना कडक शिक्षा करा असेही श्रीदिव्याने म्हटले. ही चिठ्ठी समोर आल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत कारवाई सुरू केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List