Lok Sabha Election 2024 -निवडणुकांचे निकाल अनपेक्षित असतील; अशोक गेहलोत यांचा दावा
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. जोधपूरमध्ये होळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला. सध्या देशातील परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकांचे निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित असतील, असा दावा त्यांनी केला आहे.
देशातील वातावरण बदलत आहे. देशातील दोन मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जनतेने मते देत बहुमताने निवडून दिले आहे. केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करत त्यांना अटक केली आहे. आता देशात हुकूमशाही आहे. या निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला प्रचार करता येऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. देशातील ही परिस्थिती पाहता लोकसभेचे निकाल अनपेक्षित असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
इलेक्ट्रोरल बाँड हा सर्वात मोठा घोटाळा आहे. ईडी, सीबीआय आणि आयकर यंत्रणा सरकारसाठी काम करत आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यात येत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येत आहे. तसेच देशातील दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. देशात सध्या हुकूमशाहीचे वातावरण आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे, असेही गेहलोत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List