बारामतीच्या जागेवरून वाद पेटला; विजय शिवतारे- अमोल मिटकरी यांच्यात जुंपली
बारामतीच्या जागेवरून महायुतीतील संघर्ष वाढत आहे. अजित पवार यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी आपण या जागेवरून निवडणूक लढवणारच, असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी अजित पवार यांची तुलना रावणाशी केली आहे. त्याला अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान आहे, असे प्रत्युत्तर मिटकरी यांनी दिले आहे. त्यामुळे या जागेवरून शिवतारे- मिटकरी यांच्यात जुंपली आहे.
आपली लढाई पवारांविरोधात आहे, जिंकण्यासाठीच आपण निवडणूक लढवणार असल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे. अजित पवार गटाने महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोसला आहे. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे, असे शिवतारेंनी म्हटलं आहे. बारामतीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. झुंडशाही आणि घराणेशाहीच्या लढाईच्या विरोधात मी उतरलो आहे. नवीन पर्व सुरु करण्यासाठी मी लढाई लढतो आहे, असे शिवतारे यांनी म्हटले आहे.
विजय शिवतारे यांच्या टीकेला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत शिवतारेंची तुलना दिलेर खानशी केली आहे. विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान आहे. याला मातीत गाडल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. शिवतारे यांची फडफड विझणाऱ्या दिव्यासारखी आहे. केवळ बार्गेनिंग पॉवर वाढवून पाच-पन्नास लाख रुपये गोळा करण्याचा सध्या ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. शिवतारे बालीश वक्तव्य करत आहेत. त्यांचा राजकीय अंत जवळ आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात ‘विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी’त्याचप्रमाणे विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे विजय शिवतारे आहे, असेही मिटकरी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List