Lok Sabha Election 2024 – महायुतीतील संघर्ष कायम; बच्चू कडू, अडसूळ वेगळ्या भूमिकेवर ठाम
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, जागावाटपावरून महायुतीतील संघर्ष कायम असल्याचे दिसून येत आहे. महायुतीत काही जागांवरून मतभेद आहेत. काही जागांवर तिन्ही गटांनी दावा केला आहे. त्यामुळे संघर्ष वाढत आहे. अमरावतीत प्रहारचे बच्चू कडू आणि शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांनी वेगळी भूमिका घेत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले.
अमरावती लोकसभा मतदार संघ भाजपच लढविणार, असे भाजपने जाहीर केले आहे. मात्र, खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारचे बच्चू कडू आणि शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांनी वेगळी भूमिका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या जागेवरून संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावती मतदार संघ आम्ही लढविणारच, अशी भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे. तसेच प्रहारचे बच्चू कडू यांनी महायुतीत आम्हाला विचारले जात नसेल तर वेगळी भूमिका मांडायला तयार असल्याचे म्हटले आहे.
प्रहारकडून 3 एप्रिलला उमेदवार जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असे राणा दाम्पत्य सांगत आहे. तसेच त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. महायुतीत सन्मान झाला नाही तर महाराष्ट्रात उमेदवार उभे करू, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आम्ही अपमान सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राणांविरोधात कार्यकर्त्ये नाराज आहेत. राणांचा प्रचार केला तर प्रहारमधून बाहेर पडू असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे विचारात घेत आम्ही भूमिका स्पष्ट करू, असेही कडू म्हणाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List