माझा जन्मच संघर्षासाठी; तुरुंगातून संदेश… तुम्ही फार काळ मला जेलमध्ये रोखू शकणार नाही
आंदोलक आक्रमक पोलिसांना म्हणाले गोळय़ा घाला आम्हाला!
मी या जगात मुळातच संघर्ष करण्यासाठी जन्म घेतला आहे. मी आतापर्यंत खूप संघर्ष केला आणि सध्या जी परिस्थिती दिसत आहे, त्यावरून पुढच्या काळात माझा संघर्ष आणखी तीव्र झालेला असेल.
दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने सहा दिवसांची ईडी कोठडी ठोठावली. त्यानंतर आम आदमी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी, तुम्ही मला जास्त काळ जेलमध्ये ठेवू शकणार नाहीत, असा एक संदेश तुरुंगातून पाठवत देशहितासाठी आगामी काळात लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून पाठविलेला संदेश वाचून दाखविला. याचा एक व्हिडीओ ‘आप’कडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्या जागेवर बसून यापूर्वी एखादा संदेश प्रसारित करत असत, त्याच जागेवर बसून सुनीता यांनी हा संदेश वाचला.
माझ्या देशवासीयांनो, मला काल अटक झाली. मी तुरुंगात असो किंवा बाहेर असो, मी माझ्या देशासाठी कायम कार्यरत राहील. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण, माझ्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब मी देशासाठी समर्पित केलेला आहे.
देशातील आणि देशाबाहेरील काही शक्ती देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या शक्तींचा पराभव करण्यासाठी आपल्याला सजग राहावे लागेल. कोणतेही तुरुंग मला अधिक काळ डांबून ठेवू शकत नाही. मी लवकरच बाहेर येऊन मी दिलेली आश्वासनांचे पालन करेन, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
भाजपला आरोपी बनवून अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना अटक करा
शरत चंद्र रेड्डी यांनी 9 नोव्हेंबर रोजी मी अरविंद केजरीवाल किंवा त्यांचे सहकारी विजय नायर आणि ‘आप’च्या कोणत्याही नेत्याला पैसे दिलेले नाहीत, असा जबाब नोंदविला आहे. त्यानंतर दुसऱयाच दिवशी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांनी रेड्डी यांनी आपला जबाब बदलला आणि त्यांची काही दिवसांनी जामिनावर सुटका झाली. ईडी मागच्या दोन वर्षांपासून कथित मद्य घोटाळ्यातील पैसे कुठे गेले? याचा माग काढत आहे. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या निवडणूक रोख्याच्या माहितीमधून हे पैसे कुठे मुरले? याची माहिती मिळते. रेड्डी यांनी साडे चार कोटी निवडणूक रोख्यातून दिले. त्यानंतर जेव्हा त्यांना अटक झाली, तेव्हा त्यांनी आणखी 55 कोटींचा निधी दिला. हे एकप्रकारचे मनी लाँडरिंग असून या प्रकरणी ईडीने भाजपला आरोपी बनवून अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना अटक करावी, अशी मागणी अतिशी यांनी केली.
आपचे शाहिदी पार्कमध्ये आंदोलन
केजरीवाल यांच्या अटकेविरोधात शनिवारी आम आदमी पार्टीच्या वतीने आयटीओजवळील शाहिदी पार्कमध्ये आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना अटक केली.
दुसऱयांचे सरकार भाजप चालवू देत नाही – भगवंत मान
भाजपला देशात हुकूमशाही आणायची आहे. दिल्लीत त्यांचे सरकार बनले नाही तर सरकार चालू देणार नाही, एलजी चालेल. पंजाबमध्ये सरकार स्थापन झाले नाही तर राज्यपाल त्यांना त्रास देतील. बंगाल आणि केरळमध्ये सरकार स्थापन झाले नाही तर राज्यपाल राज्य करतील. झारखंडमध्ये सरकार स्थापन न झाल्यास मुख्यमंत्र्यांना अटक केली जाईल, याचाच अर्थ भाजपचे सरकार नसल्यास ते दुसऱयांचे सरकार चालवू देत नाही, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले.
केजरीवालांच्या अटकेची जर्मनीकडून दखल
केजरीवाल यांच्या अटकेची दखल जर्मनीने घेतली असून केजरीवाल यांना निष्पक्ष आणि योग्य ट्रायल मिळावी, अशी अपेक्षा जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
आपचे कार्यालय चारही बाजूंनी सील
आम आदमी पार्टीचे पक्ष कार्यालय सर्व बाजूंनी सील करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयात लोकांचा प्रवेश कसा रोखता येईल? हे घटनेत राजकीय पक्षांना दिलेल्या समानतेच्या विरोधात आहे, असा दावा आपच्या मंत्री आतिशी यांनी केला आहे.
शरत रेड्डी कोण आहेत?
ज्यांच्या तक्रारीवरून केजरीवालांवर कारवाई, त्यांच्याकडूनच भाजपला कोटय़वधींच्या देणग्या
ज्या शरत चंद्र रेड्डी यांच्या तक्रारीवरून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली त्या रेड्डी यांनी भाजपला कोटय़वधी रुपये देऊन कसे मनी लॉण्डरिंग केले याचा भंडाफोड आपने पत्रकार परिषद घेऊन केला. अरबिंदो फार्माचे मालक शरत चंद्र रेड्डी यांना दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणानुसार मद्यविक्रीस परवानगी मिळाली होती. एपीएल हेल्थकेअर आणि ईयूजीआयए फार्मा या कंपन्यांची मालकीही शरत रेड्डी यांच्याकडे आहे. रेड्डी यांनी भाजपला कशा प्रकारे कोटय़वधी रुपये दिल्याचे पुरावेच मंत्री अतिशी यांनी दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List