विठ्ठल मंदिराला पुढची पाचशे वर्षे काही होणार नाही! श्री विठ्ठल मंदिर संवर्धनाचे काम प्रगतिपथावर
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांचे संवर्धन व सुशोभीकरण करताना बेसाल्ट दगड व चुन्याचा वापर केला जात असून, या दगडाचे आयुर्मान अनेक शतके असते. त्यामुळे किमान पुढची पाचशे वर्षे मंदिराचे मजबुतीकरण होणार आहे, असा दावा पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी केला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांसह ठेकेदार व मंदिर समिती सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, डॉ. दिनेशकुमार कदम, शकुंतला नडगिरे, माधवी निगडे, सीईओ राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, रमेश येवले, बलभीम पावले यांच्यासह इतर सदस्य ऑनलाइन उपस्थित होते.
पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी संपूर्ण मंदिराची पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मंदिराचे काम पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील बाजीराव पडसाळी येथील काम येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. सध्या मंदिरातील सभामंडप येथील पूर्वीची फरशी काढण्यात आली असून, येथील लाकडी सभा मंडपाची पाहणी केली जात आहे. मंडपावर असणारी कौले काढण्यात येत असून, यानंतर वाळवी लागलेले लाकूड काढून ते बदलण्यात येणार आहे. तसेच लाकडी मंडपाचे आयुर्मान वाढविण्यासाठी त्यावर प्लॅस्टिकचा थर देऊन पावसापासून संरक्षण केले जाणार आहे. मंदिरावर असणारे सहा ते आठ इंचाचे सिमेंटचे थरदेखील काढण्यात येत असून, यामुळे मंदिरावरील अतिरिक्त भार कमी होणार आहे, असे ते म्हणाले.
श्री विठ्ठल व रुक्मिणी मंदिरांतील गाभाऱयातील ग्रॅनाइट काढण्यात आले आहे. ग्रॅनाइट, चांदी काढल्यामुळे मूळ मंदिराचे रूप समोर आले आहे. गाभारा, चौखांबी व सोळखांबी येथील फरशीदेखील काढण्यात आली आहे. तसेच श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीच्या मंदिरांच्या कळसावरील सिमेंट काढून टाकण्यात येणार असल्याचे वाहणे यांनी सांगितले.
काढलेल्या चांदीचे संवर्धन करा…
मंदिरामध्ये काढलेल्या चांदीचे नक्षीकाम वितळवून न टाकता हा ठेवा जसा आहे तसा भाविकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावा, त्यासाठी मंदिर समितीने पुरातन वास्तूंचे संग्रहालय उभे करावे, अशी सूचना संवर्धन समितीचे सदस्य सुनील उंबरे यांनी मांडली. यावर सहअध्यक्ष औसेकर यांनी सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List