निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान टाळ-मृदंगाच्या गजराने दुमदुमली त्र्यंबकेश्वरनगरी

निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान टाळ-मृदंगाच्या गजराने दुमदुमली त्र्यंबकेश्वरनगरी

भक्तांवर अपार माया करणार्‍या सावळ्या परब्रह्माचे दर्शन म्हणजे त्रिभुवनातील सर्वोच्च आनंद… ही आषाढातील आनंदवारी अनुभवण्यासाठी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसह दिंडी मंगळवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. टाळ-मृदंगाचा गजर, विठूमाऊलीचा जयघोष करीत निघालेल्या हजारो वारकर्‍यांच्या पावलांनी वेग घेतला आहे. त्र्यंबकेश्वरची वेस ओलांडून महानिर्वाणी आखाड्यात दिंडीचा पहिला मुक्काम होता. एकूण 27 दिवसांत 453 किलोमीटर प्रवास करून हा भक्तिसागर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला 5 जुलै रोजी पंढरपुरी पोहोचणार आहे.

श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर येथे शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे आषाढी वारीची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. दोन दिवसांपासून जिल्ह्यातून सुमारे 56 दिंड्या दाखल झाल्याने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. फुलांनी सजवलेली पालखी, चांदीचा रथ लक्ष वेधून घेत होता. मंदिरात दुपारी दिंडीप्रमुखांचा सन्मान करण्यात आला. संजीवन समाधीसमोर प्रस्थानाआधीचे भजन झाले. त्यानंतर नाथांची पालखी ठेवलेला रथ मार्गस्थ झाला. संस्थानचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, विश्वस्त अमर ठोंबरे, जयंत महाराज गोसावी, नारायण मुठाळ, योगेश महाराज गोसावी, कांचन जगताप, नीलेश गाढवे आदींसह हजारो वारकरी टाळ-मृदंगाचा गजर करीत, संत-विठूनामाचा जयघोष करीत या वारीत सहभागी झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, रामकृष्ण महाराज लहवितकर, दिनकर पाटील आदींनी नाथांच्या पालखीचे दर्शन घेतले. तुळस डोक्यावर घेवून महिला वारकरी दिंडीत अग्रभागी होत्या. प्रथम तिर्थराज कुशावर्त येथे नाथांच्या पादुकांची पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर निवृत्तीनाथ भगवान त्र्यंबकराजाच्या भेटीसाठी पोहोचले. कळसाचे दर्शन घेवून अभंग गायनानंतर पुढचा प्रवास सुरू झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी दुतर्फा उपस्थित राहून पालखीवर पुष्पवृष्टी केली, नाथांचे दर्शन घेतले. यानंतर या भक्तिसागराने त्र्यंबकेश्वरची वेस ओलांडली. पहिला मुक्काम गुरूगृही म्हणजे पेगलवाडी येथील महानिर्वाणी आखाड्यात श्री गहिनीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी करण्यात आला. उद्या सकाळी दिंडी नाशिकच्या सातपूरकडे मार्गस्थ होईल. वाढोली फाटा येथे काही वेळ विसावा घेवून दुपारी महिरावणीत भोजन होईल. त्यानंतर पिंपळगाव बहुला येथे थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबून दिंडी सातपूरला मुक्कामाच्या पालखीतळावर पोहोचेल.

या दिंडीसोबत पालखीची संपूर्ण व्यवस्था पाहण्यासाठी संस्थानने पूर्णवेळ सेवक अर्थात भोई नेमले आहेत. पिण्याच्या पाण्याचे 15 टँकर, 6 वैद्यकीय पथक आणि ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्तही सोबत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट
मुंबई–गोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवटस्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्ते पावसाळ्य़ात अधिक धोकादायक ठरत आहेत....
फडणवीस-राज ठाकरे भेट… मिंधेंना टेन्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश
मतचोरीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सारवासारव, कायद्यांनुसार मतदारांची नावे समाविष्ट किंवा वगळण्याची तरतूद नाही
अखेर कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार, 8 हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे घर; कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध 
प्रकल्पग्रस्तांसाठी आता मुलुंडमध्ये 6731 घरे, पालिकेचे प्रकल्प मार्गी लागणार
वरळी, नायगाव बीडीडीवासीयांना सप्टेंबरमध्ये मिळणार नव्या घरांच्या चाव्या; ना. म. जोशी मार्गावरील रहिवाशांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा